10 ते 15 वर्षांपूर्वीपासूनच्या सदस्यांना अजूनही मानधन नाही, काही सदस्यांतून तीव्र नाराजी : सरकारचेही दुर्लक्षच
प्रतिनिधी /बेळगाव
ग्राम पंचायतीवर निवडून येण्यासाठी अनेकांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली, तर काहींनी नुसता धुरळा उडविला. ऐनकेन प्रकारे मतदारांनी निवडून दिल्यानंतर काहींनी सदस्यपद भोगले तर काहींनी अध्यक्ष, उपाध्यक्षपद भोगले. मात्र त्यांना मिळणारे मानधन अजून देण्यात आले नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मागील 10 ते 15 वर्षांपूर्वी निवडून आलेल्या सदस्यांचे मानधन अजूनही देण्यात आले नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे सदस्यांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ग्राम पंचायत निवडणुकीचा धुरळा मोठय़ा प्रमाणात उडतो. यात अनेक दिग्गजांबरोबरच माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांनाही पराभवाचा सामना करावा लागतो. दरम्यान, विजय आणि पराभव या नाण्याच्या दोन्ही बाजु आहेत. मात्र ग्राम पंचायत सदस्यांना व अध्यक्षांना मानधन मिळते तरी किती? असा सवाल उपस्थित करण्यात येत असताना अजूनही मानधन देण्याकडे सरकारने पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
सध्या तालुक्यातील अनेक ग्राम पंचायतींच्या सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्षांचे मानधन देण्यात आले नाहीत. यामुळे काही सदस्य मागील अनेक महिन्यांपासून ग्राम पंचायतीबरोबरच तालुका पंचायतीच्याही पायऱया झिजवताना दिसून येत आहेत. निवडणुकीपूर्वी अधिसूचना जारी करण्यात आल्याने मानधन देणे बंधनकारक होते. मात्र आता निवडणूक होवूनही वर्षांचा नव्हे तर तब्बल 10 ते 15 वर्षांचा काळ लोटला तरी मानधन देण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे याकडे शासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. याबाबत अनेकदा ग्राम पंचायतींतील संबंधित अधिकाऱयांशी चर्चा केली असता अद्याप शासनाकडूनच मानधन न आल्याने आपण कुठले मानधन देणार? असा प्रति सवाल त्यांनी केला आहे. यामुळे सर्वच माजी सदस्य, अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची गोची झाली आहे. लवकरच याबाबत सरकारने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
तालुक्यात 57 ग्रामपंचायती
सध्या बेळगाव तालुक्यात मागील वर्षी निवडणुकीत 54 ग्राम पंचायती होत्या. यामध्ये आता वाढ झाली असून ती संख्या आता 57 कडे गेली आहे. मागीलवेळी निवडून आलेल्या सदस्य, अध्यक्ष व उपाध्यक्षांना केवळ काही वर्षांचे मानधन मिळाले. सहा महिन्यानंतर पुन्हा मानधन काढण्यासाठी संबंधितांनी अधिकाऱयांकडे मागणी केली. मात्र आज देतो-उद्या देतो, असे सांगून केवळ टोलवाटोलवी करण्यातच धन्यता मानली. यामुळे मानधन मागण्याकडेही सदस्यांनी कानाडोळा केला. परिणामी मागील 10 ते 15 वर्षांपासून माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांचे मानधनच काढले नाही. यामुळे अनेक सदस्यांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यासाठी वारंवार संबंधितांकडे तक्रार करण्यात आली. मात्र याचे कोणतेच सोयरसुतक शासनाला नसल्याचे समजते. याकडे प्रशासने लक्ष द्यावे व जुन्या सदस्यांचेही मानधन काढावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
गत चार वर्षांपासून मानधन नाही
मागील सदस्य, अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे मानधन मागील चार वर्षांपासून काढण्यात आले नाही. यामुळे अनेकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सध्या शासनाकडून सदस्यांना 1000 रुपये, उपाध्यक्षांना 2000 रुपये आणि अध्यक्षांना 3000 रुपये मानधन देण्यात येतात. मात्र मागील चार वर्षांपासून मानधन देण्यातच आले नसल्याने अनेकांच्या कुटुंबांचा प्रश्नही निर्माण झाल्याची बाब उघडत होत आहे. लवकरच याबाबत शासनाने विचार करून मानधन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.