ऑनलाईन टीम / तरुण भारत :
निवडणूक आयोगाने शनिवारी शिवसेनेचे धनुष्यबाण हे पक्षचिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवलं. तसेच शिवसेनेचे नावही ठाकरे आणि शिंदे गटांना वापरता येणार नसल्याचे स्पष्ट करत आयोगाने सोमवारपर्यंत नवं नाव आणि चिन्ह देण्याची सूचना केली. त्यानंतर दोन्ही गटांनी आपल्या गटाला “शिवसेना बाळासाहेब ठाकरे” नाव देण्याची मागणी केली आहे. दोन्ही गटाकडून एकाच नावाचा दावा करण्यात आल्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बाळासाहेब ठाकरे हे नाव शिवसेनेची मोठी ओळख आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी “शिवसेना बाळासाहेब ठाकरे” हे नाव आपल्या गटाला मिळावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. दोघांनीही एकाच नावाचा दावा केल्यास आयोग दोघांपैकी कोणाच्याही बाजूने निकाल देत नाही. त्यामुळे हा नवा वाद कोणत्या दिशेला जातोय, हे पाहावं लागेल.
अधिक वाचा : शिव्या देणे, ही कोल्हापूरची वा महाराष्ट्राची संस्कृती नाही, अजित पवार यांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा
दरम्यान, धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याचा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा आहे. अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या चिन्हासाठी 10 तारखेपर्यंत निर्णय होणार आहे. निवडणूक आयोगाकडे असलेली चिन्ह ही दोन्ही गटांसाठी उपलब्ध असतील. जर आयोगाकडे असलेली चिन्ह दोन्ही गटाला नको असतील तर ते आपल्याला हव्या असलेल्या चिन्हासाठी मागणी करतील, त्यावर आयोग निर्णय घेईल.