तुला पाहते रे तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते
‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातलं हे गीत आपल्याला सांगू पाहतं की कोणतीही कलाकृती घडणं, ती सादर होणं हे जितकं महत्त्वाचं असतं तितकंच तिला
प्रेक्षकवर्ग किंवा आजच्या भाषेत व्ह्य़ूअर्स लाभणे अतिशय महत्त्वाचे! पुलं त्यांच्या ‘नाथा कामत’ मध्ये म्हणतात की ‘आम्ही सर्वजण पाहतो, पण नाथा जे पाहतो ते ज्ञात्याचे पाहणे!’ किंवा ‘एखादी कविता वाचावी तशा तो तरुणींना आपादमस्तक वाचीत जातो.’ यामधून त्या कलाकृतीचा आस्वाद घेणाऱयाची नजर किती महत्त्वाची असते हे अधोरेखित होतं. ही नजर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कशीही असो. कारण नाटक, गाण्यांचे कार्यक्रम, कोणताही लाइव्ह विषय, या सगळय़ात प्रेक्षकवर्ग प्रत्यक्ष समोर असतो. त्यामुळे मिळणारी दाद हीसुद्धा प्रत्यक्ष स्वरूपाची असते. ‘वाह वाह’, ‘क्मया बात है’ ची कारंजी प्रत्यक्ष समोर उडत असतात. कार्यक्रमाचे फोटो घेणारी मंडळी प्रेक्षकांचेही फोटो आवर्जून घेतात. कारण समोरचं सादरीकरण कसं चाललंय त्याचा खरा रिपोर्ट तिथेच मिळतो. दाद हा समोरच्या स्वरसादाचा आरसा आहे. पण या सर्वांसाठी दाद देण्याचे अप्रत्यक्ष प्रकारही असतातच की! आता तर आभासी, दूरभाषी कार्यक्रम होतात. फेसबुक, इन्स्टा, यूटय़ूब आणि अशा इतर अनेक सोशल नेटवर्किंग साइट्सवर लाइव्ह येणं, व्हिडिओ अपलोड करणं, पॉडकास्ट करणं अशा अनेक प्रकारांनी संगीत, साहित्य, माहिती आपल्यापर्यंत पोहचवली जाते. तिथे कॉमेंट करून आणि वेगवेगळय़ा इमोटिकॉन्सद्वारे प्रेक्षक, वाचक दाद देतात. तिथे स्वतःला सादर करण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाच्या मदतीने अतिशय सुरेख पद्धतीने पोहोचता येतं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात बहुतेकवेळा एकाने दिलेली कॉमेंट दुसऱयाला वाचायला मिळते, मित्रयादीतल्या माणसाच्या पेजवर काय चाललंय याची अपडेट येते आणि त्या साखळीने पुढे पुढे सरकत जाते. अशाप्रकारे आपण केलेल्या सादरीकरणाच्या पोस्टचे लाईक्स व्ह्य़ूज् वाढत जातात. पुढे जाऊन ते उत्पन्नाचं साधनही बनू शकतं.
सारांश महत्त्वाचं काय आहे तर साद प्रतिसादाचा खेळ आणि त्यातून नवनिर्मितीला मिळणारी चालना ही म्हणजे समुद्राच्या लाटा आणि त्यापासून ऊर्जा निर्माण व्हावी तसं आहे. मला काहीतरी सांगायचंय ही प्रत्येक माणसाची ऊर्मी असते. ते सांगण्याची माध्यमं आणि पद्धती या कलाकाराच्या अभ्यास सृजनशीलता आणि वृत्तीप्रमाणे बदलत असतात. जसं की शेतात वाकवाकून काम करणाऱया बायका आणि पुरुष असंख्य प्रकारची लोकगीतं म्हणत असतात. जसं की कोकणात लावणीच्या कामावेळी पूर्वी म्हटले जाणारे ‘चकवे’. ज्याचं उदाहरण गोनीदांच्या ‘शितू’ या कादंबरीत मिळतं.
माली जातो रं मालिया
जो जो हार फुलांचा गलि या
आता हा सवाल असतो. त्याला जवाब म्हणून ती शितू म्हणते,
ऐशा शेवंतीच्या कलिया
जो जो हार तयांचा गलि या
मग परत तो विसू सवाल म्हणून शेवंतीच्या जागी ‘ऐशा गुलाबाच्या कलिया’ म्हणून गाण्याची ओळ टाकतो. तिला उत्तर देताना फुलाचं नाव गाण्यात गुंफूनच द्यावं लागतं. शिवाय त्याची पुनरुक्ती होता कामा नये अशी अट आहे! नाहीतर चढलीच भेंडी! आता विषय असा आहे की हे गाणंच आहे. उघडय़ा आकाशाखाली कसलीच साथसंगत न घेता ते सादर होतं. मग याला श्रोते नसतात की दाद नसते? तर दोन्ही असतात. जिथे सूर असतो तिथे दाद असते. इथे दाद देणारी कामकरी माणसं असतात. मेहनतीचं काम करताना एकसुरी होऊ नये, श्रम जाणवू नयेत म्हणून हे संगीत असतं. कारण,
गाण्याने श्रम वाटतात हलके हेही नसे थोडके
इथपर्यंतचे श्रोते ऐकायला असू शकतात. गाणाऱयाची तीही तयारी हवी. पण लोकगीतं गाणाऱयांना आपल्याला कोण दाद देतंय याचं भानच नसतं. ते गातात स्वतःचे श्रम हलके करण्यासाठी. त्यांच्यासोबत इतरही गाऊ लागतात. कामाच्या वेगाची लय होते. वाजत्या पावलांचा ताल होतो. ही साद सामूहिक असते. अशाच माळवी लोकगीतांचा संग्रह आणि परिष्करण करून कुमार गंधर्व आणि त्यांच्या सहचारिणी भानुमती यांनी कितीतरी कार्यक्रम केले. त्यांचा अभ्यास करून त्यातले धूनउगम राग संशोधित केले. मालवती, मघवा, बीहड भैरव, संजारी असे कितीतरी सर्वस्वी नवनिर्मित राग त्यांच्या नावावर आहेत. विद्वान, अभ्यासू, वाग्गेयकार असलेल्या या नायकाकडून लोकसंगीताच्या या ठेव्याला, त्या शेतकरी, कामकरी बायकांच्या गाण्याला मिळालेली ही सर्वोच्च दाद नव्हे? पंडित भीमसेन जोशी यांचा एक कार्यक्रम मुंबई कोळीवाडय़ात होता. कोळी समाजाचा टिपिकल पेहराव केलेली, कमरेला आकडीकोयती बाळगलेली कष्टकरी समाजातील काही हजार माणसं या कार्यक्रमाला उपस्थित होती. हेच या कार्यक्रमाचे श्रोते असणार होते. पंडितजींनाही क्षणभर प्रश्न पडला की या माणसांना माझं शास्त्रीय उपशास्त्रीय वगैरे गाणं कसं रुचणार? हे ऐकून घेतील की गोंधळ घालतील? नेहमीच्या धीरोदात्त वृत्तीने ते गायला बसले. आणि साडेतीन तास टाचणी पडली तरीही आवाज होईल इतकी सभ्य शांतता त्या लोकांनी पाळली. आणि योग्य त्या पद्धतीने मनमोकळी दादही वेळोवेळी इतक्मया नैसर्गिकपणे दिली की पंडितजींना कार्यक्रम सार्थकी लागला असं वाटलं. ही दाद किती मोलाची होती ना?
उत्तम कलाकृती प्रेक्षकांना, श्रोत्यांना नेहमी विचारप्रवण करते. बेचैन करून सोडते. पाहणाऱया, ऐकणाऱयाला प्रतिसाद द्यावासा वाटतोच वाटतो. भावना उचंबळून येतात. समोरच्या कलाकारांवर, त्यांच्या प्रस्तुतीवर जीव ओवाळून टाकावासा वाटतो, त्यावर किती बोलू आणि किती नको असं वाटतं. म्हणून एकाच प्रस्तुतीवर प्रत्येकाकडून येणारी दाद वेगवेगळय़ा प्रकारे येत असते. ती कलाकारांना सुखावते. त्यांना नवं काही सुचतं. त्यातूनच नवीन काही घडतं. दर्जा सुधारतो. मुक्तपणे दिलेल्या अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया नवनवीन कलाकृती जन्माला घालायला कारणीभूत ठरतात. म्हणून दाद देणं महत्त्वाचं.
प्रकटे हृदयांतरातून ब्रह्मनाद
तो सवेंची ये त्या प्रतिसाद
तया मंथनातून मनोल्हाद
नवनीत वोसंडे
-ऍड. अपर्णा परांजपे-प्रभु