पाहणी करून केली प्रशंसा : विकसित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी केले प्रोत्साहित
बेळगाव : केंद्र सरकारच्या माध्यमातून तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. याचबरोबर राज्य सरकारही मागे नाही. दरम्यान, तलावांची खोदाई व इतर विकास साधण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे करण्यात येत आहेत. याचबरोबर उद्योग खात्रीची जोड देऊन तालुक्यातील अनेक तलाव पुनरुज्जीवित करण्यावर भर देण्यात आला आहे. सध्या तालुक्यातील अमृत सरोवर योजनेंतर्गत तलावांचे सुशोभिकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये अगसगे व म्हाळेनट्टी येथे काम करण्यात येत असून अगसगेचा अमृत सरोवर आता राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना भावला आहे. अधिकाऱ्यांनी पाहणी करून अहवाल केंद्र सरकारकडे पाठविणार असल्याचे सांगितले. राज्य सरकारकडून जिल्ह्यातील अनेक ग्राम पंचायतींना भेटी देऊन अमृत सरोवरची कामे कशा पद्धतीने सुरू आहेत, याची माहिती देण्यासाठी अधिकाऱ्यांना पाठवून देण्यात आले आहे. बेळगाव तालुक्यातही अमृत सरोवरची कामे सुरू आहेत. सध्या अगसगे येथे अमृत सरोवरचे काम बऱ्यापैकी झाले आहे. त्यामुळे याची पाहणी करण्यासाठी नुकतेच राज्य सरकारचे पथक बेळगावला आले. त्यांनी अगसगे येथील अमृत सरोवर योजनेंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या तलावाची पाहणी केली. या तलावाचा करण्यात आलेला विकास पाहून त्यांनी प्रशंसा केली आहे. दरम्यान, अशीच कामे झाल्यास तालुक्याचा विकास निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले. अगसगे येथे सध्या तलावाची निर्मिती करण्यात आली असून एवढ्या उन्हातही त्या ठिकाणी पाणी साठून आहे. पावसाळ्यात या ठिकाणी वृक्षारोपण करून नागरिकांना आसन व्यवस्था व चालण्यासाठी ट्रॅक करण्यात येणार आहे. बाजूने पथदीप बसविण्यात येणार असल्याने हा तलाव सुंदर होणार आहे, अशी माहिती संबंधित अभियंत्यांनी अधिकाऱ्यांना दिले. बेंगळूरवरून आलेल्या अधिकाऱ्यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली आहे.
सरकारी जागेत गवताचे उत्पादन घ्या
यावेळी बेंगळूरवरून आलेल्या अधिकाऱ्यांनी तलावाच्या बाजूला सरकारी खुली जागा आहे, त्या जागेमध्ये गवताचे उत्पादन घेतल्यास सोयीचे ठरणार आहे. जेणेकरून परिसरातील नागरिकांना याचा फायदा होईल. त्यांच्या जनावरांना चाराही मिळेल. यासाठी या ठिकाणी ग्राम पंचायतच्या माध्यमातून चाऱ्याचे उत्पादन घ्यावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
अगसगे तलावाचे नाव केंद्र सरकारकडे पाठविणार
अमृत सरोवर योजनेंतर्गत तलावांच्या कामांची पाहणी करून ती केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहेत. प्रत्येक राज्यातील 10 जिल्ह्यांची नावे केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असून त्यामध्ये निवड करून सर्वोत्कृष्ट तलावांना नावाजले जाणार आहे. बेंगळूरवरून आलेल्या पथकाने अगसगे तलावाचे नाव केंद्र सरकारकडे पाठविणार असल्याची माहिती मिळाली आहे. याचबरोबर म्हाळेनट्टी येथेही तलावाची पाहणी करण्यात आली. या पथकामध्ये राज्य प्रोजेक्ट अभियंते विनय, बसवराज एन. अभियंते व पीडीओ नागराज यरगुद्दी, अभियंते रुद्राप्पा बशेट्टी व इतर उपस्थित होते.