राजस्थानामध्ये उंट हा प्राणी अत्यंत मौल्यवान समजला जातो. केवळ उंटाचा उपयोग त्या वाळवंटामध्ये होतो म्हणून नव्हे तर तेथील संस्कृतीतच उंटाचे एक आगळेवेगळे स्थान आहे. वास्तविक सध्याच्या काळात वाहतुकीचे एक साधन म्हणून वाळवंटी भागातही उंटाचा उपयोग कमी झालेला आहे. तरीही उंटावरचे हे प्रेम संस्कृतीचा भाग म्हणून तेथील लोक प्राणपणाने जपतात.
वसंत ऋतुमध्ये उंटांना शृंगारले जाते. उंटांसाठी विशिष्ट प्रकारचे दागिने तयार केले जातात. असे दागिने तयार करणारे कारागिर आणि त्यांचा व्यापार करणारे व्यापारीही मोठय़ा संख्येने तेथे आहेत. पडची, जाली, काठी, नवरियामाला, गजरा, नकेल, गोरबंध, मणियाकी माला, पेटी, बाजा आणि मोरा अशी तेथील स्थानिक भाषेतील या दागिन्यांची नावे आहेत. महाराष्ट्रात ज्या प्रमाणे बैल पोळय़ा दिवशी बैलांना शृंगारले जाते. तशाच प्रकारे हा उत्सव राजस्थानात उंटांच्या संदर्भात साजरा केला जातो. सणांच्या दिवशी उंटांना अशाप्रकारे सजविले जाते की महिलांचा शृंगारही त्याच्यासमोर फिका पडावा. उंटाची पाठ सजविण्यासाठी विशेष प्रकारची झूल तयार करण्यात येते. या झुलीवर आकर्षक नक्षीकाम आणि छोटे आरसे लावलेले असतात. उंटांच्या शृंगाराची स्पर्धाही भरते. ती पाहण्यासाठी हजारो लोक उपस्थित असतात. विविध प्रकारचे खाद्यपदार्थही उंटांसाठी तयार केले जातात. वर्षभर उंट माणसाला जी सेवा देतो तिची काही प्रमाणात परतफेड करण्यासाठी कृतज्ञतापूर्वक हा उत्सव उंटांचे मालक आणि सर्वसामान्य लोकही साजरा करतात. वर्गणी गोळा करून उंटांचा शृंगार केला जातो. हा केवळ सांस्कृतिक सोहळा नसून स्थानिक कलाकारांचे अर्थशास्त्रही त्यात दडलेले आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियामुळे असे अनोखे उत्सव साऱयांच्या दृष्टीला पडलेले आहेत. त्यामुळे त्यांचे महत्त्व वाढले असून हा सांस्कृतिक वारसा अधिकाधिक समृद्ध होत आहे.