राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची माहिती : रखडलेला खंडपीठाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार
प्रतिनिधी/कोल्हापूर
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात होण्यासाठी मुख्य न्यायमुर्ती सकारात्मक आहेत. त्यामुळे खंडपीठाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहे. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत खंडपीठ कृती समितीची भेट घडवून देणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्हयांकरिता कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे या मागणीकरिता मागील 30 वर्षापासून आंदोलन सुरु आहे. सुमारे 1 कोटी 58 हजार जनता, 17 हजार वकील आणि पक्षकारांची कोल्हापुरात खंडपीठ व्हावे हि रास्त मागणी आहे. सुमारे 62 हजार खटले प्रलंबित आहेत. कोल्हापूर जिह्यातील ग्रामीण भागातील शेवटचे टोक मुंबई पासून सुमारे 780 किलोमीटर च्या आसपास आहे. तेथून मुंबई येथे येणे जाणे, वकिलांची फी हे ग्रामीण भागातील जनतेच्या आवाक्याबाहेरील आहे. पिढय़ान् पिढय़ा लोकांना न्यायाच्या प्रतीक्षेत थांबावे लागते.
महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी 12 नोव्हेंबर 2012, 7 सप्टेंबर 2013, 17 जुलै 2015, 28 फेब्रुवारी 2018, 19 जुन 2019 आणि 8 मार्च 2022 रोजीच्या पत्रांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्कालीन मुख्य न्यायाधीशांकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिह्यातील अधिकार क्षेत्राचा वापर करण्याकरिता कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ/ सर्किट बेंच स्थापन करण्याबाबतचा पत्रव्यवहार केला आहे. खंडपीठ कृती समितीच्या शिष्ठमंडळाने 10 मार्च 2022 रोजी मुख्य न्यायमूर्तींची भेट घेतली आहे. 1984 साली औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन झाल्यानंतर राज्यातील दक्षिणेकडील प्रदेशात समाविष्ठ असणाऱया या सहा जिह्यातून कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे, अशी सातत्याने मागणी करण्यात येत आहे.
हे ही वाचा : शिंदे गटाच्या एजंटांचा सेना स्टाईलने समाचार
सद्यस्थितीत मुख्य न्यायमूर्ती यांच्या कार्यालयाकडून खंडपीठ कृती समितीस पत्र व्यवहार करण्यात आला असून, यासंदर्भात मुख्य न्यायमूर्ती देखील सकारात्मक आहेत. मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचा उल्लेख पत्रात केला आहे. त्यामुळे कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन होण्यासाठी शासन स्तरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य न्यायमूर्ती यांची बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तसेच लवकरच खंडपीठ कृती समितीच्या शिष्ठमंडळाचाही मुख्यमंत्री यांच्यासोबत भेट घडवून आणणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.