पुणे / प्रतिनिधी :
आपण युद्धात जिंकतो आणि तहात हरतो. तसे होऊ नये, याकरिता सीमाप्रश्नाच्या प्रकरणात आपल्याला शिवरायांचा गनिमी कावा अवलंबवावा लागेल. राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत याप्रश्नी हुशारीने आपली बाजू मांडावी, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी येथे दिला. शाईफेकप्रकरणात कारवाई जरुर करावी. पण कोणावरही अन्याय होऊ नये. निष्पाप व्यक्तींवर कारवाई होता कामा नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी पिंपरीत शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी त्यावेळी बंदोबस्तावर असलेल्या 11 पोलीस कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले असून, यात तीन वरिष्ठ अधिकार्यांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना पवार म्हणाले, मला चंद्रकांत पाटील यांना अजिबात चॅलेंज द्यायचे नाही. तुम्ही तुमचे काम करा, मी माझे काम करत आहे. पण चंद्रकांत पाटील यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याविषयी केलेले वक्तव्य हे चूकच होते. मात्र कुठल्याही व्यक्तीवर अशाप्रकारे शाईफेक करू नये. वैचारिक मतभेद असतील, पण कायदा हातात कोणी घेऊ नये. त्याचबरोबर आपण बोलताना कोणाला त्रास होणार नाही, याचीही काळजी संबंधितांनी घेतली पाहिजे. शालजोडीतील शब्द वापरता येतात, पण कालची गोष्ट अयोग्य होती. महापुरुषांविषयी बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे, असा सल्ला पवार यांनी दिला.
समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाबाबत समाधान व्यक्त करताना ते म्हणाले, या रस्त्यामुळे अनेक गावे जोडली गेली असून, प्रवासाचा वेळ कमी होईल. पुढचा टप्पा लवकर होण्याकरिता काम सुरू होईल. आमच्या सरकारच्या काळातही समृद्धी महामार्गाला मदत दिली, आम्ही उद्घाटन करणार होतो; पण एका ब्रिजचे काम राहिले. त्यामुळे ते करता आले नाही.