पर्रावरणदिनी शाळेला बहर येऊन सौंदर्य खुलले; विद्यार्थ्यांसह शिक्षक पालकांच्या चेहऱ्यावर हास्य
डिचोली : देशातील पहिली हरीत शाळा म्हणून मान प्राप्त होऊन या नवीन संकल्पनेची शाळा इमारतस्वरूपात उभी राहिलेली विठ्ठलापूर सांखळी येथील विठ्ठल रखुमाई सरकारी प्राथमिक शाळा सोमवारी मुलांनी गजबजून गेली. पर्यावरणदिनीच या हरीत शाळेला मुलांच्या उपस्थितीने बहर आला आणि शाळेचे सौंदर्य खुलून दिसले. चार वर्षांनंतर या शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन प्रार्थना व प्रतिज्ञा सादर केली. शाळेच्या पहिल्या दिवशी या हरीत शाळेत आपल्या मुलांना घेऊन येणाऱ्या पालकांच्या चेहऱ्यावर आनंदी व समाधानी हास्य दिसत होते. शिक्षकही उत्साहात होते.
या हरीत शाळेचे गेल्या 3 फेब्रुवारी 2023 रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले होते. त्यानंतर काही तांत्रिक गोष्टी मागे राहिल्याने विद्यार्थ्यांचे स्थलांतर या शाळेत करण्यात आले नव्हते. परंतु गेले शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी चौथीच्या विद्यार्थ्यांना या शाळेत बसण्याचा व हरीत शाळा अनुभवण्याची संधी मिळावी यासाठी पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष वर्धमान शेंदूर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेतला. व चौथीच्या मुलांना अखेरच्या सुमारे दहा दिवसांचे वर्ग या नवीन शाळेत घेण्यात आले होते. त्यामुळे इतर सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांनाही ही शाळा सुरू होण्याची आतुरता लागली होती. ती आतुरता सोमवारी संपुष्टात येऊन हरीत शाळेत या शालेय वर्षांच्या पहिल्या दिवसापासून वर्ग सुरू झाले. सकाळी या शाळेचा परिसर विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीने बहरून गेला होता. शाळा इमारतीत आपले वर्ग व वर्ग मित्र मैत्रिणी शोधण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ उडाली होती. पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग पहिल्या दोन मजल्यांवर भरविण्यात येत आहेत. सर्व विद्यार्थ्यांना आपापले वर्ग मिळाल्यानंतर त्यांना खाली असलेल्या सभागृहात आणण्यात आले. तेथे सर्वांनी प्रार्थना व प्रतिज्ञा सादर केली. व पुन्हा आपल्या वर्गांकडे कुच केली. सर्व विद्यार्थी व शिक्षकांच्या चेहऱ्यावर प्रसन्न उत्साह दिसून येत होता.
राज्य सरकारने उचलला शाळा इमारती उभारण्याचा विडा
सरकारी प्राथमिक शाळेतील पटसंख्येला लागलेली गळतीचे कारण या शाळेच्या जीर्ण व जर्जर इमारती होत्या. हा मुद्दा लक्षात घेऊन 2012 साली राज्यात स्थापन झालेल्या भाजप सरकारने गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळा मार्फत राज्यातील सर्व शाळांची दुरूस्ती हाती घेतली होती. तसेच शिक्षण क्षेत्रातही बरेच बदल घडवून आणत दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न केले होते. त्याचाच एक भाग म्हणून ज्या सरकारी शाळांमध्ये भरघोस विद्यार्थीसंख्या आहेत, अशा जीर्ण शाळा इमारतींच्या ठिकाणी प्रशस्त व शिक्षणासाठी आजच्या काळात विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले वातावरण निर्माण करणाऱ्या शाळा इमारती उभारण्याचा विडा राज्य सरकारने उचलला आहे.
2017 साली राज्यात भाजप सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर या शाळेच्या कामाला गती देण्यात आली होती. तत्पूर्वी ही शाळा इमारत प्रशस्त व्हावी यासाठी माजी सभापती स्व. अनंत शेट यांनीही सरकारदरबारी प्रस्ताव सादर करून पाठपुरावा केला होता. त्यानंतरच या शाळेच्या नवीन इमारतीचा विषय पुढे आला. तत्कालीन सभापती व विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या हरीत शाळेच्या इमारतीची पायाभरणी झाली होती. शाळ इमारत लवकर पूर्ण व्हावी व त्याचे लोकार्पण व्हावे यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वत: लक्ष घातले होते. तर स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही पाठपुरावा सुरूच ठेवला होता.
एकदा पाहिल्यावर डोळे एकाच ठिकाणी खिळवून ठेवणाऱ्या या शाळा इमारतीत एकूण 16 वर्ग आहेत. तळमजल्यावर एक प्रशस्त सभागृह असून त्यात एकाचवेळी 600 ते 700 लोक समावू शकतात. याच सभागृहाच्या बाजूला एक संगीत कक्ष आणि एक नृत्य कक्ष असे स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. वरच्या मजल्यांवर 40 चौरस मीटरचे वर्ग, त्यात अद्ययावत बाकडे व फळे, एक लहान मुलांसाठी खेळ कक्ष, वरच्या (तसऱ्या) मजल्यावर प्रशस्त खुला सभागृह त्याला लागूनच मुलांना आपले कार्यक्रम सादर करण्यासाठी ओपन ऑडिटोरीयमची सोय करण्यात आली आहे. प्रवेशद्वाराच्या गोलाकार भागात वरच्या मजल्यावर योग प्रशिक्षण केंद्र तयार केला असून त्याला तारांगणचे स्वरूप देण्यात आले आहे. या शाळा इमारतीत सर्व बाजूंनी सूर्यप्रकाश व मोकळी हवा खेळण्याची व्यवस्था आहे. वर्गांमध्ये समूह शिक्षणाची संकल्पना राबविण्यात आली आहे. तर वरच्या मजल्यावरून विठ्ठलापूरचे हरित सौंदर्य न्याहाळण्याची अविस्मरणीय अशीच संधी या शाळेमुळे प्राप्त होते.
हरीत शाळा राज्यात, देशात आदर्श ठरणार – प्रेमेंद्र शेट
शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल आणून हसते खेळते शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या भाजपा सरकार आणि मुख्यमंत्र्यांमुळे राज्यातील शाळांना नवीन आयाम प्राप्त होत आहे. या कामांसाठी सरकार चांगले योगदान देत असून देशतील पहिली हरीत शाळा आपल्या मये मतदारसंघात साकारण्यात आली. आणि या शैक्षणिक वर्षात ती विद्यार्थ्यांनी गजबजल्याने समाधान वाटत आहे. ही हरीत शाळा राज्यात आणि देशात आदर्श ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार प्रेमेंद्र शेट यांनी व्यक्त केली.