मंडणगड/प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. मंडणगड तालुक्यातील किंजलघर येथे आज दरड कोसळली. त्यामुळे तीन घरांना धोका निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळताच तहसिलदार दत्तात्रय बेर्डे यांनी घटनास्थळी भेट देत दिली. यावेळी त्यांनी तीन घरातील १६ व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दरडीचा काही भाग पावसाच्या पाण्यासोबत खाली आला. सुदैवाने पावसाचा जोर ओसरला असल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान,किंजलघर येथे दरड कोसळल्याची घटना समजताच तहसीलदार दत्तात्रय बेर्डे, गटविकास अधिकारी सुवर्णा बागल, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सकपाळे व महसूल कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. परिस्थितीची पाहणी केली असता याठिकाणी तीन घरांना धोका निर्माण झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
हे ही वाचा : Ratnagiri : परशुराम घाट १२ जुलैपर्यंत बंद राहणार?
यावेळी तस्लिम अयुब ओंबीलकर, हसमत महमद शेख, तन्वीर अयुब ओंबीलकर यांच्या घरातील एकूण १६ नागरीकांना गावातीलच त्यांच्या अन्य नातेवाईक यांच्याकडे आवश्यक सामानासहित सुरक्षित स्थलांतरित केले. तसेच त्यांना अन्नधान्य किटही देण्यात आले आहे. पावसाचा जोर वाढल्यास निर्माण होणारा धोका मोठा असल्याने महसूल विभाग याकडे लक्ष ठेवून असल्याचे तहसिलदार बेर्डे यांनी सांगितले. सदरचा परिसर हा संपर्क क्षेत्राच्या बाहेर येत असल्याने संपर्क होणे अडचणीचे ठरत आहे. तथापि तातडीच्या प्राथमिक उपाययोजना करण्यात आल्या आहेत