पुणे / प्रतिनिधी :
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत भाजपाचा प्रस्ताव काय येतो, ते पाहून याविषयी निर्णय घेऊ, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी येथे मांडली.
‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाची माहिती देण्यासाठी पटोले पुण्यात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. कसबा विधानसभा पोटनिवडणूक आम्ही बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करू, अशी भूमिका भाजपाचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे. तो प्रस्ताव तुमच्यापर्यंत आल्यावर काय भूमिका राहणार, असा सवाल केला असता पटोले म्हणाले, महाराष्ट्राची एक पंरपरा राहिली आहे. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास ती निवडणूक बिनविरोध करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस बिनविरोध पाठिंबा देण्याचे काम आम्ही केले. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंढरपूर, देगलूर, कोल्हापूर यासह अनेक ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत संबधित कुटुंबातील व्यक्तीला भाजपाने विरोध करण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता भाजपाचा नेमका प्रस्ताव काय येतो, हे पाहू व त्यावर आपण बोलू. मात्र, अजूनतरी प्रस्ताव आलेला नाही, असे त्यांनी सांगितले.
कसब्यासाठी मास्टर प्लॅन तयार
कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातील अनेक जण इच्छुक आहेत. उमेदवारांची रीघ लागली असून, 8 ते 10 जणांनी माझ्याकडे अर्ज केले आहेत. येथे 1980 पर्यंत काँग्रेस पक्षाचे प्राबल्य होते. हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे आणण्यासाठी आमचा मास्टर प्लान तयार आहे. त्यावर आमचे काम सुरू आहे. 3 किंवा 4 फेब्रुवारीपर्यंत आमचा उमेदवार जाहीर करू, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली.