मोडलेली आसन व्यवस्था, लोंबकळणारे पत्रे ठरताहेत धोकादायक : तातडीने दुरुस्तीची गरज
बेळगाव : शहरातील बसथांब्यांची वेळच्या वेळी दुरुस्ती केली जात नसल्याने त्यांची दयनीय स्थिती झाली आहे. बसथांब्यासाठी वापरण्यात आलेले पत्रे केव्हा कोसळतील, याची शाश्वती नसल्याने एखाद्या निष्पाप प्रवाशाचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न प्रवाशांमधून विचारण्यात येत आहे. धर्मवीर संभाजी चौकातील वनिता विद्यालयासमोरील बसथांब्यातील बैठक व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली आहे. समोर लावलेल्या स्टीलचे ग्रील कोसळले असून येण्या-जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. तसेच थांब्यावर बसविण्यात आलेले पत्रे मोडून लोंबकळत असून केव्हा कोसळतील हे सांगता येत नाही. शहराच्या मध्यवर्ती भागात जर ही स्थिती असेल तर उपनगरांमध्ये काय चित्र असेल? याचा विचार न केलेलाच बरा. वनिता विद्यालयासमोरील बसथांब्यावरून दररोज हजारो विद्यार्थी ये-जा करत असतात. या परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये असल्याने विद्यार्थी बसमधून उतरल्यानंतर या ठिकाणी थांबतात. तसेच चन्नम्मा चौक, सीबीटी या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना याच ठिकाणी थांबावे लागते. त्यामुळे मोडकळलेल्या बसथांब्यामध्ये थांबण्याशिवाय प्रवाशांकडेही पर्याय नाही. त्यामुळे बसथांब्यांची वेळेत दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.