अध्याय सत्रावा
सर्वांचा स्वधर्म एकत्रित सांगताना भगवंत म्हणाले, जो सद्भावाने प्राण्यांचे हितच करत असतो तो सर्व प्राणिमात्राना प्रिय असतो, त्याला सर्व संसार मी सुखरूप करून देतो. अहिंसा आदिकरून जे सात गुण सांगितले आहेत, तो सर्वांचाच स्वधर्म होय. सर्व आश्रमांना व सर्व वर्णांना मुख्यत्वे करून हाच धर्म आहे. आता आश्रमाबद्दल सांगतो. तिन्ही आश्रमात श्रे÷ असलेल्या गृहस्थाश्रमाचा धर्म म्हणजे तिन्ही आश्रमाना आश्रय देणे. तसेच इतर तिन्ही आश्रमातील लोकांना अन्नवस्त्र देऊन त्यांचे संरक्षण करणे. ब्रह्मचर्याश्रमाचे वर्तन म्हणजे गुरूची सेवा व वेदाध्ययन करून राहाणे, त्याला दान देण्याचा मात्र अधिकार नसतो. ब्रह्मचाऱयाला जे काही प्राप्त होईल, ते ते त्याने गुरूला अर्पण केले पाहिजे. गुरूवाचून इतर कुणाला तो दानधर्म करेल, तर तो अधर्म होईल. थोडक्मयात शिष्याच्या सर्व मालमत्तेवर गुरूचा अधिकार असतो. वानप्रस्थाश्रमामध्ये विशेषकरून तप हेच मुख्य आहे. वेदोक्तविधीप्रमाणे त्याने अग्नीची सेवा करावी. संन्यासी, ब्रह्मचारी किंवा दीन दुबळे प्रसंगानुसार आश्रमात आल्यास त्यांना यथानुशक्ति अन्न द्यावे. हाच वानप्रस्थाचा आश्रमधर्म होय.
संन्याशाला अहिंसा हीच मुख्य आहे. ज्ञानपरिपाकाने त्याला पूर्ण शांती लाभते. ओळख नसेल अशा ठिकाणी फिरून भिक्षा मागणे हाच चतुर्थाश्रमातील मुख्य धर्म होय. पण, जो भक्त माझ्या भजनी तत्परतेने लागतो, त्याला मात्र ह्या आश्रमांचा नियम लागू नाही. उद्धवा ! तो माझ्या भजनानेच कृतकृत्य होतो, हे निश्चित समज. सद्भावाने माझी भक्ती करू लागले म्हणजे त्याला विवेकयुक्त वैराग्याची योग्यता प्राप्त होते. माझी पूर्ण सत्ताच त्यांच्या हाती लागते. त्यामुळे त्याला सायुज्यतामुक्ति दिली तरी तो ती घेत नाही. असे जे माझे श्रे÷ भक्त असतात, त्यांना आश्रमाचा नियम लागू नाही. त्यांचा सारा स्वधर्म म्हणजे मीच. असे श्रीकृष्णाने सांगितले. तसेच कोणापाशी कधीच काही मागावयाचे नाही, असा माझ्या भक्ताचा नेम असल्याने, त्याला पिडणाऱया क्षुधादि व्यथेचे जो निवारण करतो त्याला अन्न, धन, वस्त्र, पात्र, मीठ वगैरे देतो व स्वतःचे द्रव्य खर्ची घालून जो माझ्या भक्ताचे संरक्षण करतो ते करताना जो त्याचा तिरस्कार करीत नाही, किंवा मी दिले हे मोठे उपकार केले असेही मानीत नाही, तर अत्यंत सन्मानाने व नम्रतेनेच माझ्या भक्ताचे रक्षण करतो. पोटातील कळवळय़ाने आई जसे उत्तम असेल तेच मुलाला देते, त्याप्रमाणे जो आपला स्वार्थ सोडून माझ्या भक्ताचे रक्षण करतो त्याला मी माझ्या भक्तालाही मागे टाकून आपल्या मस्तकावर घेतो व नंतर त्याला वैकुंठालाच काय पण त्याच्याही वरती नेऊन ठेवतो. ज्याला मी आपल्या मस्तकावर घेतले, त्याला दुर्लभ असे काय असणार ? उद्धवा ! माझ्या भक्तांचे जो संरक्षण करतो, त्याचा मी उद्धार करतो. माझ्या भक्तांची संकटे आपण होऊन जो दूर करेल, त्याला तत्काळ संसारसागराच्या पैलथडीला मी पोचवतो.
उद्धवा ! नौका जशी धनवान् मनुष्याला समुद्रामधून तारून नेते, त्याप्रमाणे माझ्या भक्तांचे रक्षण करणाऱयांचा मी संसारातून उद्धार करतो. ह्याप्रमाणे जो धनवान् मनुष्य माझ्या भक्ताचे संरक्षण करतो, देवकीवसुदेवाशपथ मी त्याचा उद्धार करतो. ह्यात मी एक कर्म करणारा अशी आपल्या चित्तातील भावना सोडून देऊन प्रत्येक प्राणिमात्र भगवत्स्वरूप आहे, अशी भावना धरली म्हणजे ते कर्म ब्रह्मार्पण सहज होते. कर्माचा अभिमान सोडला की ते कर्म ब्रह्मार्पणच होते.
उद्धवा! संकल्पाशिवायच कर्म ब्रह्मार्पण होण्याची ही खूण होय. माझ्यामुळे हे कर्म झाले आणि ते मी कृष्णार्पण केले, असा संकल्प मनाने व वाणीने केला, की त्याचे कर्तृत्व त्याच्याच अंगी येते आणि जो कर्माचा ‘कर्ता’ मी असे म्हणतो, तो त्या कर्माचा ‘भोक्ता’ ही होतो. म्हणून उद्धवा ! अहंता हीच काय ती मुख्यत्वे बाधक आहे. ज्याच्या ठिकाणी अहंममता असते, त्याच्यामागे नित्यबद्धताही लागतेच आणि जो निरभिमानी व निर्मम असतो, त्याच्यापाशी नित्यमुक्तताच नांदते.
क्रमशः