उत्तर प्रदेशातील बिठुर किंवा ब्रम्हावर्त येथे एक वैशिष्टय़पूर्ण गणेश मंदिर आहे. पुरातन काळापासून ते अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते. 400 वर्षांपूर्वी या मंदिराचा प्रथम उल्लेख आढळतो. 1857 च्या स्वातंत्र्य समरात ब्रिटिशांशी संघर्ष केलेले नानासाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांनी या गणपतीचे दर्शन घेतले होते. या मंदिरातील गणेशमूर्तीचे वैशिष्टय़ असे, की सूर्य आणि चंद्र उगवल्यानंतर त्यांचे पहिले किरण या गणेशमूर्तीवर पडतात. तशाप्रकारे या मंदिराच्या गाभाऱयाचे द्वार रचण्यात आलेले आहे. हा गणपती सिद्धिविनायकाच्या स्वरुपात आहे.
या गणपतीची सोंडही उजवीकडे वळलेली आहे. इतिहासकाळातील सर्व प्रमुख व्यक्तींनी या गणेशाचे दर्शन घेतल्याचे उल्लेख इतिहासात आढळून येतात. भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी मूर्ती म्हणून हा गणपती पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. 1857 च्या स्वातंत्र्य समरात ब्रिटिशांनी तोफ डागून हे मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, गंगामातेने स्वतःला प्रकट होऊन या मंदिराचे संरक्षण केले, अशी श्रद्धा आहे. ब्रिटिशांनी बिठुरवर हल्ला केल्यानंतर अचानक गंगा नदीला पूर आला आणि त्यामुळे ब्रिटिशांना कारवाई आवरती घ्यावी लागली. परिणामी हे मंदिर उद्ध्वस्त करण्याचे त्यांचे मनसुबेही उद्ध्वस्त झाले, अशी माहिती इतिहासकार देतात. एकंदर हे मंदिर भक्तांच्या हृदयात वेगळेच स्थान मिळवून आहे.