गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथक : भेसळ व अधिक दराने विकणाऱ्यांवर कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत बी-बियाणे उपलब्ध व्हावीत आणि फसवणूक थांबावी यासाठी कृषी खात्याच्या भरारी पथकाची नजर राहणार आहे. त्यामुळे साठा करून अधिक दराने विक्री करणाऱ्यांना आळा बसणार आहे. कृषी खात्याने सर्वती तयारी पूर्ण केली आहे. बी-बियाणे, खते आणि कीटकनाशके रयत संपर्क केंद्राकडे पुरविली आहेत. दरम्यान शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खतांचा तुटवडा पडणार नाही. याची काळजी घेतली जाणार आहे.
मान्सून तेंडावर आला आहे. त्यामुळे वेळेत हंगाम साधण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर पेरणी हंगामाची धांदल सुरू होणार आहे. दरम्यान बी-बियाणे आणि खतांच्या मागणीत वाढ होणार आहे. अशावेळी काही कृषी सेवा केंद्रावर अधिक दराने खत आणि बियाणांची विक्री होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. हे रोखण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 7.10 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भात, ज्वारी, मका, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तंबाखू, तूर आदी बियाणांची मागणी वाढणार आहे. दरम्यान हंगाम साधण्यासाठी शेतकरी मिळेल त्या दराने बी-बियाणे खरेदी करतात. या संधीचा फायदा घेऊन कृषी सेवा केंद्राकडून अधिक दराने बियाणांची विक्री होत असते. शिवाय अनावश्यक बी-बियाणांचा साठा केला जातो. तर निकृष्ट दर्जाची आणि भेसळयुक्त बियाणे आणि खतेदेखील विकली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते, असे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथक सज्ज झाले आहेत. हंगामाला सुरुवात होताच विविध ठिकाणी असलेल्या कृषी सेवा केंद्रांना भरारी पथक भेट देणार आहे. दरम्यान गैर प्रकार आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
तर विक्रेत्याचा परवाना रद्द करणार
जिल्ह्यात 35 रयतसंपर्क केंद्र, 121 पीकेपीएस संघ आणि 14 तात्पुरत्या सेवा केंद्रातून बी-बियाणे, खतांचे वितरण सुरू झाले आहे. मात्र हंगामाचा फायदा घेऊन काही कृषी सेवा केंद्रावर अधिक दराने बी-बियाणांची विक्री होते. असे गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथक काम करणार आहे. यामध्ये कृषी खात्याचे अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, रयत संपर्क केंद्रातील अधिकारी, ग्रामसेवक यांचा समावेश असणार आहे. कृषी सेवा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास तातडीने विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याचा इशारादेखील कृषी खात्याने दिला आहे.
बी-बियाणे आणि रासायनिक खतामध्ये भेसळीचे प्रमाण वाढले आहे. बी-बियाणे आणि खते खरेदी केल्यानंतर पावती आणि बियाणे घालून दिलेली बॅग जपून ठेवावी, असे आवाहनदेखील खात्याने केले आहे.
गैर प्रकार आढळल्यास तातडीने कारवाई : राजशेखर विजापूर (सहसंचालक, कृषीखाते)
शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. शिवाय शेतकऱ्यांनी फसवणुकीचे प्रकार आढळून आल्यास तालुका कृषी अधिकारी किंवा रयत संपर्क केंद्रात संपर्क साधावा. गैर प्रकार आढळल्यास तातडीने कारवाई केली जाणार आहे.