प्रतिनिधी / खानापूर : गेल्या आठवडाभरापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बिजगर्णी येथील नारायण वामन भास्कर यांचे राहते घर कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घर कोसळले असून जीवित हानी टळली आहे.
नारायण भास्कर, त्यांचे आई वडील व मुलगा रोजच्याप्रमाणे जेवण करून गुरूवारी रात्री आपल्या घरात झोपले होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास एक भिंत पडल्याचा आवाज आला आणि घरातील सदस्य जागे झाले. यामुळे घर पडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर घरातून ही मंडळी बाहेर आली यामुळे जीवितहानी टळली आहे.
घर कोसळल्यामुळे जीवनावश्यक साहित्याचे नुकसान झाले आहे. शिवाय आता राहायचे कुठे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर ,विधान परिषद सदस्य चनराज हटीहोळी, तलाठी, पीडीओ आदींनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे.