राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा संदेश ः सरन्यायाधीश रमणा यांनी दिली राष्ट्रपतीपदाची शपथ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून दौपदी मुर्मू यांनी शपथग्रहण केले आहे. त्यांना सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी शपथ दिली. त्या देशाच्या प्रथम आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. सोमवारी सकाळी दहा वाजता संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात शपथविधी कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर त्यांना प्रथेप्रमाणे 21 तोफांची मानवंदनाही देण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या अभिनंदनाचा संदेश ट्विटरवरुन नंतर प्रसारित केला.
या शानदार कार्यक्रमाला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला, केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, विरोधी पक्षांचे नेते, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि अनेक खासदार या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुर्मू यांनी हिंदी भाषेतून शपथग्रहण केले. अधिकृतरित्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी देशाला उद्देशून भाषण केले. जनतेचे हित आपल्यासाठी सर्वतोपरी असून महिला सबलीकरणासाठी आपण प्रयत्नशील राहू असे स्पष्ट करतानाच त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये देशाने विविध क्षेत्रात केलेल्या लक्षणीय कामगिरीचा आणि साधलेल्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांनी आपले भाषण ‘जोहार’ या शब्दाने सुरु केले. जोहार याचा अर्थ आदिवासी भाषेत ‘नमस्कार’ असा होते, अशी माहिती नंतर देण्यात आली.
महिला, युवकांसाठी कार्यरत राहणार
देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाचे उत्तरदायित्व आपल्या हाती देण्यासाठी त्यांनी देशाच्या जनतेचे आभार आपल्या भाषणात मानले. ज्या भागातून आपण आलो आहोत, त्या भागात प्राथमिक शिक्षण मिळणेही एखाद्या स्वप्नासारखे असते. गरीब आणि मागासांमध्ये मला स्वतःचे प्रतिबिंब दिसते. या पदावर मी नेहमीच देश, महिला आणि युवक यांच्या हितासाठी कार्यरत राहीन. स्वतंत्र भारतात जन्माला आलेली मी प्रथमच राष्ट्रपती आहे. लोकांचा विश्वास आणि समर्थन मला नवे उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी सामर्थ्य देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्यसैनिकांची ध्येयपूर्ती
राष्ट्रपती पदापर्यंत पोहचणे ही माझ्यासाठी स्वतःची उपलब्धी नाही. ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे मी माझे ध्येय मानते. राष्ट्रपती पदासाठी माझी उमेदवारी हे दर्शविते की या देशातील गरीब केवळ स्वप्ने पहात नाही, तर ती पूर्णही करु शकतो. गेल्या काही वर्षांमध्ये देशाने अनेक क्षेत्रांमध्ये मोठी झेप घेऊन प्रगती साध्य केली आहे. याच मार्गावर देशाला यापुढेही वेगाने वाटचाल करायची आहे. मी माझ्या अधिकारात हे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
गांधीसमाधीचे दर्शन
राष्ट्रपतीपदाची शपथ घेण्यापूर्वी मुर्मू यांनी राजघाटवर जाऊन गांधीसमाधीचे दर्शन घेतले. समाधीवर डोके टेकवून त्यांनी प्रार्थनाही केली. त्यानंतर त्यांचे संसदेत आगमन झाले. त्या ओडिशाच्या असल्याने त्या राज्यातून 64 विशेष अतिथी शपथविधी कार्यक्रमासाठी आलेले होते. त्यांना मुर्मू यांनी विशेष आमंत्रण देऊन बोलाविले होते. त्यांच्यासाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
नातेवाईकांची उपस्थिती
मुर्मू यांचे बंधू तरणीसेन टुडू आणि त्यांच्या भावजय (बंधूंच्या पत्नी) सुकरी या उपरबेडा गावातून येऊन या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. याशिवाय कन्या इतिश्री, जावई, दोन नाती उपस्थित होत्या. त्यांची खास वर्गमैत्रिण धानकी मुर्मू, द्रौपदी मुर्मू यांचे सध्याचे निवासस्थान ज्या गावी आहे, त्या रायरंगपूर येथील भाजप कार्यकर्ते विकास महातो आणि त्यांचे चार मित्र या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
25 जुलैला शपथ घेतलेले राष्ट्रपती
भारताचे सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी 25 जुलै 1977 या दिवशी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर 25 जुलैला शपथ देण्याची प्रथा पडली आहे. आतापर्यंत ग्यानी झैलसिंग, व्यंकटरामन, शंकरदयाळ शर्मा, नारायणन, एपीजे अब्दुल कलाम आणि रामनाथ कोविंद या राष्ट्रपतींनी 25 जुलैला शपथ घेतली आहे.
शुभसंदेशांचा वर्षाव
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यापासूनच दौपदी मुर्मू यांच्यावर शुभसंदेश आणि अभिनंदनाचा वर्षाव होत होता. श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याच प्रमाणे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही त्यांना शुभसंदेश पाठविला आहे. सध्या लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सेना एकमेकींसमोर उभ्या असताना आणि सीमेवर तणाव असताना जिनपिंग यांच्या संदेशाला महत्व दिले जात आहे. चीन आणि भारत हे एकमेकांचे महत्वपूण्& शेजारी आहेत. दोन्ही देशांमधील बळकट आाणि स्थिर संबंध दोन्ही देशांमधील लोक आणि जग यांसाठी महत्वाचे आहेत, असे जिनपिंग यांनी म्हटले आहे.
मोठय़ा अंतराने विजयी
नुकत्याच झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी भाजप-रालोआ पुरस्कृत उमेदवार या नात्याने विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला होता. मुर्मू यांनी या निवडणुकीत 64 टक्क्यांहून अधिक मते प्राप्त केली होती. तर सिन्हा यांना साधारणतः 35 टक्के मते मिळाली होती.