अध्याय चोविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा माझ्या अनन्य भक्तावर माझी पूर्ण कृपा असते. माझ्या भक्तांना माझ्याशिवाय दुसरी गती कधीच प्राप्त व्हावयाची नाही. वेदातील सर्व विधी हे लोकांना शिस्त लागावी, त्यांनी विषय बेताने भोगावेत म्हणून सांगितले आहेत पण माझे निष्काम भक्त, एक मी सोडलो तर इतर काही जाणतच नसल्याने ते विषयांपासून दूरच असतात. ते विरक्त असल्याने त्यांना वेदविधींची अडचण उत्पन्न होत नाही. त्यांना माझ्या कृपेचाच पूर्ण प्रसाद प्राप्त होत असल्याने त्यांना वेदविधी बाधक होत नाहीत. जे माझे सकाम भक्त असतात, त्यांना मी त्यांच्या भक्तीचे फळ जरूर देतो पण अशी फळे कायम टिकणारी नाहीत हे लक्षात आले की, मिळालेली फळे भोगल्यानंतर तेही निष्काम होतात आणि शेवटी माझ्या निजधामाला येतात. उद्धवा माझ्या भक्तांना माझ्यावाचून दुसरी जागाच असत नाही. ज्याच्या ठिकाणी माझी सप्रेम भक्ती नाही, त्याला कर्मे हटकून बाधक होतात. उद्धवा! अभक्त असतात ते कर्मामुळेच दुसरी गती पावतात. जेथे माझी खरी भक्ती असते, तेथे कर्माची गती चालत नाही. ह्याच कारणाने माझ्या भक्तांना माझी प्राप्ती होते. भक्तांना सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी माझाच भाव असतो, त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ते करत असलेले सर्व काम माझेच असते. त्यामुळे त्यांच्या खात्यावर पाप पुण्य जमा होतच नसल्याने त्यांना कर्मबंधनाची बाधा होण्याचा प्रश्नच येत नाही. अशा पद्धतीने कर्माची गतीच त्यांच्यापाशी खुंटून जाते. परिणामी माझ्या भक्तांना आपोआपच माझी प्राप्ती होते. तुला एक गंम्मत सांगतो, माझा भक्त स्वतःला कधी कर्ता समजत नाही किंबहुना स्वतःला कर्ता न समजणे आणि त्यावर ठाम असणे हीच तो माझा एकनि÷ भक्त असल्याची खूण आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी त्यानं जमिनीवर पाऊल ठेवलं तरी त्यानं ते स्वतः ठेवलं असं मानत नाही. सर्वकर्ता भगवंत आहे हेच तो सत्य मानतो, म्हणून तो कधीही कर्माच्या बंधनात बांधला जात नाही. समजा एखादा दुराचारी असेल आणि तो जर माझी भक्ती करू लागला तर त्याचा पूर्वीच्या पापकर्मामुळे नाश न होता, तो माझी अनन्य भक्ती करत आहे या एका गोष्टीवर मी त्याचे मागले सगळे पाप धुवून टाकून त्याला आपलेसे करतो. हे मी अर्जुनाला गीतेत सांगितले आहेच ते असे, असो मोठा दुराचारी भजे मज अनन्य जो । मानावा तो जसा साधु त्याचा सुंदर निश्चय ।। 9.30 ।। शीघ्र तो होय धर्मात्मा शांती शाश्वत मेळवी । जाण निश्चित तू माझा भक्त नाश न पावतो ।। 9.31 ।। हेच माझे खरे ब्रीद होय. मी भक्तांना दुसरी गती मिळूच देत नाही. दुर्वास मुनींनी भक्ताला शाप दिल्याची गोष्ट ऐकताच मी त्या भक्ताचा कैवार घेण्यासाठी लागलीच उठलो आणि सुदर्शन पाठीमागे लावून दुर्वासाना ग्रस्त करून सोडले. अंबरीषाकरिता मी दहा गर्भवास सोसले, अशा एकनि÷ भक्तांना कोणत्याही प्रकारे मी काहीही कमी पडू देत नाही. नाथमहाराज सांगतात की, भक्ताचा कैवारी श्रीकृष्ण आहे, हीच भक्तीरहस्यातील मुख्य गोष्ट आहे. शुद्ध भावाशिवाय जी भक्ती, तीच दांभिक भक्ती किंवा नाटकी भक्ती असे समज. ज्याप्रमाणे मुगातले कुचर दाणे अपक्व राहतात, तशी ती दांभिक भक्ती अपक्वच रहावयाची. ‘भक्तीयोगस्य मद्?गतीः’ असे मूळ श्लोकातील पद आहे. तेच किती वाढविले, असे कुणी म्हणू नये. कारण ‘मद्?गती’ या पदाची व्युत्पत्ती किती आहे कोण जाणे! त्यातील रहस्य जाणणारा मनुष्य पृथ्वीवर विरळा. याकरिता जाणकारांनी क्षमा करावी नाथमहाराज पुढं म्हणतात, अहो! भक्ती ही माझी माता आहे. जिने प्रेमपान्हा पाजून मला वाढविले आणि भगवद्भजनात थोरपणा मिळवून दिला, त्या भक्तीचं तसं बघितलं तर फारच कमी वर्णन मी केलं. भागवत हे मुख्यतः भक्तीप्रधान आहे. भक्तीचं वर्णन करत जावं तसतशी तिची गोडी अधिकच वाढते आणि त्यात सांगणारे तसेच ते ऐकणारे दोघेही न्हाऊन निघतात. यातूनच नवविधा भक्तीची म्हणजे ईश्वराला आनंदित करणाऱया नऊ प्रकारांची कल्पना निघाली पण सर्वांचे उद्दिष्ट ईश्वरभक्ती हे एकच होय.
क्रमशः