महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात आता तोकडे कपडे घालणाऱ्या नागरिकांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे निर्णय घेतला असून याबाबतचा फलक मंदिर परिसरात लावण्यात आला आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाद्वारे ही निर्णय घेतला असून यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पुरोगामी संघटनांनी या निर्णयाला विरोध केला असून त्यावर आता राज्यासह देशभरातील भाविकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचं भान ठेवा अशा आशयखाली श्री तुळजाभवानी मंदिराच्या परिसरामध्ये संस्थानने अनेक ठिकाणी फलक लावले आहेत. या फलकांवर अंग प्रदर्शन होणाऱ्या, उत्तेजित करणाऱ्या, तसेच असभ्य व अशोभनीय कपडे परिधान केलेल्या लोकांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. याच बरोबर हाफ पँट, बर्मुडा अशा गोष्टीही निषिद्ध असून मंदिर परिसरात यालाही विरोध असेल असे फलकातून भाविकांना संदेश दिला आहे.
तुळजाभवानी मंदिर प्रशासनाच्या या निर्णयानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी जोरदार विरोध दर्शिवला आहे. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “राज्यघटनेने प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. कुणी कसले कपडे घालावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मंदिरामध्ये वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक येत असतात आणि ते आपल्या परिने कपडे परिधान करत असतात.त्यामुळे कुठले कपडे उत्तेजित आहेत आणि कुठले नाहीत हे ठरवण्याचा अधिकार मंदिर प्रशासनाला नाही. भाविक मंदिरामध्ये भक्तीभावाने येत असतात. ते ज्या भावनेने येतात त्याकडे आपण पाहीले पाहीजे. त्यांच्या कपड्यांकडे अजिबात नाही.”
ऱाष्ट्रवादी कॉंग्रेसच्य़ा खासदार विद्या चव्हाण यांनी ही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “भक्तांना सुद्धा अक्कल असते कि कोणत्या प्रकारचे कपडे मंदिरात वापरले जातात.तुम्ही धर्माच्या ठेकेदारांनी लोकांच्या आस्थेमध्ये लुडबुड करू नका. महिलांना आणि भाविकांना ज्या पद्धतीचे पेहराव आरामदाय़ी वाटतो त्याप्रकारचे कपडे ते घालतील. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपण धर्माचे रक्षक असल्याचा आव आणू नका. तुमचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही.”
राज्यातील विविध मंदीर प्रशासनाने अशा प्रकारचे निर्णय़ घेतले होते. त्याला लोकांनी जोरदार विरोध केल्यानंतर असे निर्णय मागे घेतले गेले. यामध्ये कोल्हापूरातील अंबाबाई मंदीर, आणि शिर्डीचे साईबाबा संस्थान यांचा समावेश आहे.