ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजपने टिळक घराण्याला डावलल्यामुळे ब्राह्मण समाजात नाराजीचा सूर असल्याचे बोलले जात आहे. कुलकर्णी, टिळकांनंतर आता नंबर बापटांचा का? अशी बॅनरबाजीही शहरात करण्यात आली आहे. पण भाजपमध्ये नाराजीची भाषा चालत नाही, हा शिस्तबद्ध पक्ष आहे, असे कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी म्हटले आहे.
रासने म्हणाले, मी मागील 30 वर्षांपासून पक्षासाठी काम करत आहे. 2019 ला मी विधानसभेचे तिकीट मागितले होते. पण त्यावेळी पक्षाने मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली. तरीही नाराज न होता मी मुक्ता टिळक यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. आता आमदारकीची संधी मिळाली आहे. टिळक घराण्याला डावलून मला तिकीट दिल्याने कसब्यातील ब्राह्मण समाज नाराज असल्याचे समजते. पण भाजपमध्ये नाराजीची भाषा चालत नाही. हा शिस्तबद्ध पक्ष आहे. कोणीही कसाही प्रचार केला तरी निवडणुकीत मीच जिंकणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अधिक वाचा : कुलकर्णी, टिळकांनंतर आता नंबर बापटांचा?, पुणे शहरात अनोखी फ्लेक्सबाजी