येत्या 1 डिसेंबर रोजी उपोषण, जनआंदोलनाचा इशारा
रत्नागिरी प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गासाठी लोकांनी आपल्या जमिनी दिल्या…घरे, दुकाने रिकामी करून दिली…पण अजूनही काम तडीस नाही…ठेकेदाराला कोणतंही देणंघेणं नाही…प्रशासनाची पुरती डोळेझाक…लोकप्रतिनिधी निर्जीव झालेत…त्यांना चिंता राहिलेली नाही…शासन लोकपतिनिधींचे ऐकत नाही…ही कोकणवासियांची मोठी शोकांतिका बनलेय. त्यासाठीच 1 डिसेंबर रोजी संगमेश्वरमधील आरवली-खेरशेत-बावनदी दरम्यानच्या महामार्ग कामांसाठी तीव्र जनआंदोलनाचा इशारा मुंबई-गोवा महामार्ग जनआकोश समिती रत्नागिरीचे युयुस्तु आर्ते यांनी दिला.
यासंदर्भात रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेला या समितीचे युयुस्तु आर्ते यांच्यासह वहाब दळवी, राजेश आंबेकर, परशुराम पवार, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे हारिस शेकासन, रमजान गोलंदाज, सलीम सय्यद अनिरुध्द कांबळे व आतिष पाटणे आदींची उपस्थिती होती.
तळेकांटे ते आरवली दरम्यान भागात जे.एन.म्हात्रे ही ठेकेदार कंपनी काम करत असून यात मनमानी आणि अंधाधुंदी सुरू असल्याचा आरोप समितीने केला. राष्ट्रीय महामागाच्या कामाचा नाहक त्रास स्थानिकांना होत आहे. या कंपनीच्या विरोधात अनेक तक्रारी असून त्याची तत्काळ चौकशी व कारवाई करण्यात यावी. 28 नोव्हेंबर 22 पर्यंत चौकशी न झाल्यास 1 डिसेंबर 22 रोजी सकाळी 11 वाजता संगमेश्वर येथे हे उपोषणासह जनआंदोलन होणार आहे.
यासंदर्भात मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती रत्नागिरीतर्फे 14 मागण्या जिल्हा पशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गावर दगड फोडण्यासाठी बोरवेल ब्लास्टिंगचा वापर होत असून परिसरातील लोकांच्या घरांना तडे गेले आहेत. त्याची चौकशी करून भरपाई देण्याचे आदेश व्हावेत. कोळंबेत रॉयल्टी न भरता, बेकायदेशीरपणे सुरू असलेला अनधिकृत मोबाईल कशर बंद करण्यात यावा. झालेल्या उत्खननाचे मोजमाप करून रॉयल्टी व दंड आकरण्यात यावा. परवाना नसताना अनेक ठिकाणी स्टॉक करून ठेवलेली खडी जप्त करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या आहेत.
महामार्ग कामासाठी ओव्हरलोड वाहतूकीची चौकशी करून तत्काळ त्या गाड्या जप्त करून दंड वसुल करावा. कुरधुंडा गावमळा येथील बेकायदा काँक्रीट प्लांटची चौकशी करून कारवाई करावी. महामार्गावरील खड्डे तत्काळ डांबराने भरण्याचे आदेश व्हावेत. रस्त्यालगत बांधलेल्या संरक्षण भींतीच्या चौकशी करण्यात यावी, आदी मागण्याचा समावेश आहे. येत्या 15 दिवसात कारवाई न झाल्यास सनदशीर मार्गाने उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागेल असा इशारा आर्ते व त्यांच्या सहकाऱयांनी या पत्रकार परिषदेत दिला.
राजकीय वरदहस्तामुळेच ठेकेदार जे.एन.म्हात्रे कंपनी बेफिकीर
आरवली-खेरशेत ते वाकेड या दरम्यानच्या महामार्गाचे काम घेतलेल्या ठेकेदार जे.एन.म्हात्रे कंपनी कोणाला जुमानत नसल्याची स्थिती आहे. कुणी तकार केल्यास पोलीस यंत्रणेमार्पत आवाज दाबण्याचा प्रकारही सुरू आहे. राजकीय वरदहस्तामुळेच ही ठेकेदार कंपनी बेफिकीर झाल्याचा आरोप परशुराम पवार यांनी केला आहे.