वृत्तसंस्था/ नागपूर
भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने शनिवारी सांगितले की, नागपूरच्या संथ खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना ड्राईव्ह खेळण्यास प्रवृत्त करण्याची आणि त्याभरात त्यांना चुका करण्यास भाग पाडण्याची त्याची योजना चांगलीच कामी आली. या सामन्यात भारताकडून सर्वाधिक बळी अश्विनने घेतले असून त्याने एकूण 79 धावांत 8 बळी घेतले.
खेळपट्टी खूपच संथ होती. मी हे कसोटीच्या दरम्यान सांगत आलो आहे की, ही अशा खेळपट्ट्यांपैकी नाही जिथे तुम्हाला शॉर्ट लेग किंवा सिली पॉइंटवर झेल घेता येतील. या खेळपट्टीवर फलंदाजाला ड्राईव्ह करण्यास भाग पाडण्याची गरज असते. म्हणून मला वाटले की, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना दोनपैकी एक चेंडू ड्राईव्ह करण्यास प्रवृत्त करावे. त्याभरात बॅटच्या कडेला चेंडू लागला, तर लागला’, असे अश्विन सामन्यानंतर म्हणाला.
सहकारी फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचीही त्याने खूप स्तुती केली. मला जडेजाकडून मोठी मदत मिळाली असे म्हणणे कमीपणाचे ठरेल. तो अभूतपूर्व फॉर्ममध्ये आहे. गेल्या तीन वर्षांत त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी आणि गोलंदाजी केली आहे ते पाहता तो किती चांगला खेळतो आणि संघात किती महत्त्वाची भर घालतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अक्षरही साधारण गोलंदाज नाही. आमच्याकडे फिरकीपटूंचा खूप चांगला संच आहे आणि आम्ही सर्व जण चांगली फलंदाजीही करू शकतो, असे अश्विन म्हणाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोठ्या विजयाबद्दल विचारले असता तो म्हणाला की, मी आमच्या फलंदाजांना याचे श्रेय देईन, त्यांनी ऑस्ट्रेलियाला भरपूर वेळ मैदानावर ठेवले. त्यानंतर लगेच फलंदाजीस उतरणे त्यांच्यासाठी कठीण होते’.