बेळगाव : शहरातील गटारींच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने परिस्थिती गंभीर बनू लागली आहे. वळिवाच्या पावसामुळे गटारी तुंबून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येऊ लागले आहे. काही ठिकाणी गटारीतून पाण्याचा निचरा होत नसल्याने घाणपाणी घरात शिरू लागले आहे. मनपा प्रशासनाने वेळीच गटारींची स्वच्छता करावी, अन्यथा पावसाळ्यात मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. विशेषत: बाजारातील गटारीमध्ये कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाजारात गटारी भरून दुर्गंधीयुक्त पाणी सर्वत्र पसरू लागले आहे. त्याबरोबरच प्लास्टिक कागद, बाटल्या आणि कचरादेखील विखुरला जात आहे. परिणामी दुर्गंधी पसरत असल्याने ये-जा करणेदेखील अडचणीचे ठरू लागले आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या पावसाने तुंबलेल्या गटारींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गटारी तुंबल्याने पाणी रस्त्यावर
शहरातील नाले, गटारी, ड्रेनेजची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता होणे आवश्यक आहे. मात्र नाले आणि गटारींच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. वळीव पावसातच तुंबलेल्या गटारींचा प्रश्न निर्माण झाला आहे. गटारीतून माती, प्लास्टिक बॉटल व इतर साहित्य साचून असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे गटारी तुंबून पाणी रस्त्यावर वाहू लागले आहे. परिणामी रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी पसरू लागले आहे. त्यामुळे स्थानिक विक्रेते आणि नागरिकांनादेखील समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.