अपघात घडण्यापूर्वी मजबूत भिंत बांधण्याची नागरिकांतून मागणी
बेळगाव : नैत्य रेल्वेकडून गोगटे सर्कल ते तिसरे रेल्वेगेटपर्यंत रेल्वेरुळाच्या बाजूने उभारलेली संरक्षक भिंत कोसळण्याच्या स्थितीत आहे. निकृष्ट प्रतीचे करण्यात आलेले बांधकाम, त्यातील काँक्रिटच्या निखळत असलेल्या प्लेटी यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात असून, रेल्वेने या ठिकाणी मजबूत भिंतीची उभारणी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण होणार असल्याने काही वर्षांपूर्वी नैत्य रेल्वेने काँक्रिटच्या प्लेटची भिंत उभी केली. गोगटे सर्कल ते तिसरे रेल्वेगेटपर्यंत काँग्रेस रोडच्या बाजूने भिंत राहिली. बरेच नागरिक या भिंतीच्या बांधकामापूर्वी काँग्रेस रोडवरून टिळकवाडीच्या दुसऱ्या भागात चालत जात होते. याचबरोबर गुराखी देखील या ठिकाणी आपली जनावरे चरण्यासाठी सोडत होते. यामुळे अनेक रेल्वे अपघात घडले असल्याने संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आले.
दर्जाहीन बांधकामाचा नमुना
संरक्षक भिंत बांधताना निकृष्ट प्रतीचे साहित्य व दर्जाहीन बांधकाम असल्यामुळे काही महिन्यातच यातील प्लेट निखळून पडू लागल्या. या संरक्षक भिंतीच्या एका बाजूला काँग्रेस रोडवरील फुटपाथ तर दुसऱ्या बाजूला रेल्वेचा रूळ आहे. जर ही संरक्षक भिंत कोसळल्यास फुटपाथवरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच रेल्वेलाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी मजबूत भिंतीची उभारणी करण्याची मागणी होत आहे.
रेल्वेरूळ ओलांडताना सावधानतेची गरज
रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण शेवटच्या टप्प्यात आहे. येत्या काही दिवसात मिरज-हुबळी मार्गावर विद्युत इंजिनाच्या साहाय्याने रेल्वे धावणार आहे. यासाठी रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूनी विद्युत खांब उभे करण्यात आले आहेत. यामध्ये हाय व्होल्टेज वीजपुरवठा असून नागरिकांनी रेल्वेरूळ ओलांडताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे.