सर्वत्र पाणीच पाणी : गुडघाभर पाण्यातून वाट काढताना कसरत, अनेकांच्या घरात शिरले पाणी, पिकांना दिलासा, शहरातील जनजीवन मात्र विस्कळीत
प्रतिनिधी /बेळगाव
निसर्गाची ताकद काय असते हे पुन्हा एकदा वरुणराजाने बेळगावकरांना दाखवून दिले. बुधवारी दुपारनंतर पावसाने शहरासह उपनगरे आणि ग्रामीण भागाला झोडपून काढले. या पावसाने साऱयांचीच दाणादाण उडवून टाकली. बघता बघता पाणीच पाणी झाले होते. मुख्य रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचून राहिले. अनेकांच्या दुकानात व घरांमध्ये पाणी शिरल्याने साऱयांचीच तारांबळ उडाली होती.
गेल्या आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. बरेच दिवस कडक उनदेखील पडले. त्यामुळे पाऊस पडेल की नाही? याची भीती लागून होती. मात्र बुधवारी शहरासह ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. वाहन चालकांना समोरचे काहीच दिसत नव्हते. एक तर रस्त्यावर गुडघाभर पाणी आणि पावसाचा जोर यामुळे वाहने चालविणे कठीण झाले. यामुळे अनेक रस्त्यांवर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.
या दमदार पावसामुळे छत्रीदेखील घेऊन जाणे अवघड झाले. बुधवारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी पाऊस जाण्याची वाट पाहताना दिसत होते. पावसाला जोर इतका होता की थांबायचे कोठे? हाच प्रश्न साऱयांना पडला. रेनकोट, छत्री असूनही भिजावे लागत होते. त्यामुळे अनेकांनी आडोसा शोधला. मात्र प्रत्येकजण आडोसा शोधत असल्यामुळे अनेकांना थांबण्यासाठी जागाच मिळाली नाही. त्यामुळे पावसातून भिजत वाट काढावी लागली.
शहरातील ग्लोब थिएटर, गावावेस सर्कल, रामदेव गल्ली, गणपत गल्ली, रविवारपेठ, मारुती गल्ली या परिसरात सर्वच रस्त्यांवर पाणी साचून होते.
कपिलेश्वर रेल्वे ओव्हरब्रिजवरही वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. पाऊस आणि वाहतुकीची कोंडी यामुळे सारेजण घाईला आले होते. या पावसाने फेरीवाले, भाजी विपेते आणि इतर बैठे व्यापारी यांची चांगलीच तारांबळ उडवून दिली. ग्राहक तर नाहीतच उलट असलेला भाजीपालाही या पावसामध्ये वाहून जात होता.
अनगोळसह उपनगरांत पाणीच पाणी
मुसळधार पावसाने अनगोळमध्ये अक्षरशः सर्वत्र पाणीच पाणी झाले. अनेकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. अनेक रस्त्यांवर गुडघ्यापेक्षाही अधिक पाणी साचून होते. त्यामधून वाट काढणे अशक्मय झाले होते. स्मार्ट सिटीच्या कामांचा बोजवारा या पावसाने उघडा पाडला आहे. अनगोळ बरोबरच भाग्यनगर, मराठा कॉलनी, शास्त्राrनगर, शहापूर, वडगाव, आनंदनगर, मंडोळी रोड, टिळकवाडी या परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचून होते तर काही ठिकाणी दुकानांमध्ये पाणी शिरले होते.
पोलिसांना द्यावा लागला धक्का
बसवेश्वर सर्कल येथे वाहतुकीचा सिग्नल सुरू करण्यात आला आहे. मात्र या सर्कलमधील स्विमिंगपूलच्या समोर गुडघ्यापेक्षाही अधिक पाणी साचून राहत आहे. कमी पाऊस पडला तरी त्या ठिकाणी पाणी साचत आहे. बुधवारी तर मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे गुडघाभर पाणी होते. यातच एक कार बंद पडली. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. शेवटी रहदारी पोलिसांनी धक्का मारत हे वाहन त्यापाण्यातून बाजुला काढले आणि रस्ता मोकळा केला. पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांचे कौतुक होत आहे. कारण जोरदार पाऊस असल्यामुळे कोणीच बाहेर पडत नव्हते. पोलिसांनी मात्र भर पावसात भिजत हे वाहन बाजुला काढले.
खानापूर तालुक्यात मुसळधार पाऊस
बुधवारी दुपारी खानापूर तालुक्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. दुपारी तीन वाजता अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सर्वांची तारांबळ उडाली. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. सोमवारी जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर बुधवारी दुपारी 3 वाजता गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. सतत तीन तास मोठय़ा प्रमाणात पाऊस पडल्याने गटारी तुंबून रस्त्यावरून पाणी वाहत होते.
गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस नव्हता. गेले पाच-सहा दिवस कडक ऊन होते. गेल्या दोन दिवसांपासून गडगडाटाने पाऊस होत असल्याने हवामानात बदल होऊन निसर्गाचा लहरीपणा दिसून येत आहे. कडक ऊन आणि अचानक पाऊस असा गोंधळ निर्माण झाला आहे. सध्या होत असलेला पाऊस भात, भुईमूगसह इतर पिकांना पोषक ठरणार आहे.
नंदगड परिसराला अडीच तास झोडपले
नंदगड परिसरात बुधवारी अडीच तास मुसळधार पाऊस झाला. हा पाऊस भात पिकाला पोषक आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. बुधवारी दुपारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अडीच तास पाऊस झाला. त्यामुळे कौलारू घरांतून पाणी शिरले. गटारी तुडुंब भरून वाहू लागल्या तर काही ठिकाणी गटारी भरल्याने रस्त्यावरून पाणी जात होते. बुधवारी नंदगडचा आठवडी बाजार असल्याने रस्त्यावर विक्रीसाठी मांडलेला भाजीपाला व काही साहित्य वाहून गेले. बाजारासाठी गेलेल्यांची या पावसामुळे मात्र धांदल उडाली होती.