अनेक माजी न्यायाधीश, प्रशासकीय अधिकाऱयांची सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांवर टीका
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात केलेली टिप्पणी पूर्णतः अयोग्य आणि न्यायव्यवस्थेच्या उच्च परंपरांना छेद देणारी आहे, अशी टीका अनेक माजी न्यायाधीश आणि माजी प्रशासकीय अधिकाऱयांनी केली आहे. नुपूर शर्मा यांनी गेल्या महिन्यात एका टीव्ही वाहिनीच्या चर्चा कार्यक्रमात बोलण्याच्या ओघात इस्लामचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यासंबंधी विधाने केली होती. या विधानांचे पडसाद भारतात आणि जगभर उमटले होते.
यासंदर्भात देशभरातील विविध राज्यांमध्ये 28 ठिकाणी शर्मा यांच्या विरोधात तक्रारी सादर करण्यात आल्या आहेत. या सर्व ठिकाणी आपल्याला न्यायालयीन कारवाईसाठी जाता येणे शक्य नाही. आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणांना तोंड देण्यासाठी आपण देशभर प्रवास करु शकत नाही. म्हणून आपल्या विरोधातील सर्व प्रकरणे एकत्र करुन एकाच न्यायालयात चालविण्यात यावीत, अशी मागणी करणारी याचिका शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. मणिंदर सिंग या ज्येष्ठ विधिज्ञांनी नुपूर शर्मा यांचा पक्ष सर्वोच्च न्यांयालयायाच्या सुटीतील खंडपीठासमोर मांडला होता.
न्यायाधीशांची कठोर टिप्पणी
नुपूर शर्मा यांची जीभ सैल आहे. त्यांच्या विधानांमुळेच देशभर दंगली उसळल्या. या दंगलींसाठी त्या सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यांच्यामागे असणाऱया प्रभावशाली शक्तींमुळेच त्यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यांच्या विधानांमुळेच उदयपूर येथे एका व्यक्तीचा जीव घेतला जाण्याची घटना घडली आहे. त्यांनी टीव्हीवर येऊन देशाची जाहीर क्षमा मागावयास हवी. अशा प्रकारची टिप्पणी तोंडी निरीक्षण करताना न्यायाधीशांनी केली. यामुळे देशात मोठे वादळ निर्माण झाले आहे.
मान्यवरांची वादात उडी
सन्माननीय न्यायाधीशांच्या या टिप्पणीचे तीव्र पडसाद सोशल मिडियावर उमटत आहेत. शर्मा यांच्या विरोधात कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नसताना अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाकडून कशी करण्यात आली ? दहशतवादी लोकांनी केलेल्या हिंदूंच्या हत्यांची जबाबदारी शर्मा यांच्यावर न्यायालयाने कोणत्या आधारावर टाकली ? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. आता या वादात अनेक माजी न्यायाधीश आणि प्रशासकीय अधिकाऱयांनीही उडी घेतली आहे. अशा 117 मान्यवरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर टीका करताना त्यांची टिप्पणी अयोग्य असल्याचे प्रतिपादन पेले आहे. अद्याप काहीही अधिकृतरित्या सिद्ध झालेले नसताना अशी टिप्पणी न्यायप्रक्रियेच्या उच्च परंपरांना अनुसरुन नाही. यामुळे न्यायव्यवस्थेवर डाग लागला आहे, असा आशय असणारे खुले पत्र या मान्यवरांनी प्रसिद्ध केले आहे. अशी टिप्पणी करण्याचा प्रकार आजवर सर्वोच्च न्यायालयात घडलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असा दृष्टीकोन बाळगत असतील तर कनिष्ठ न्यायालयात शर्मा यांच्यावरील अभियोग निष्पक्षपातीपणाने चालविला जाणे अशक्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीचा परिणाम शर्मा यांच्या अभियोगावर होणार आहे, अशीही टीका केली जात आहे. यासंर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे एक याचिका सादर करण्यात आली असून न्यायाधीशांची टिप्पणी मागे घेण्याची मागणी होत आहे.
शेरे मागे घ्या
न्यायाधीशांनी शर्मा यांच्या विरोधात केलेली टिप्पणी अनाठायी, अनावश्यक असल्याने आणि न्यायाची बूज राखणारी नसल्याने ती मागे घेण्यात यावी, अशी मागणी 117 मान्यवरांनी प्रसिद्ध केलेल्या खुल्या पत्रात केली असून हे पत्र टीव्ही आणि मिडियावर सध्या मोठय़ा प्रमाणावर प्रसिद्ध होत आहे.