डाळी, तांदूळ, भाज्यांच्या दर नियंत्रणामुळे किंचित दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील किरकोळ महागाईचा दर फेब्रुवारी महिन्यात 6.44 टक्क्मयांवर आला आहे. जानेवारी 2023 मध्ये तो 6.52 टक्के आणि डिसेंबर 2022 मध्ये 5.72 टक्के होता. तर, त्यापूर्वीच्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर 2022 मध्ये किरकोळ महागाई दर 5.88 टक्के होता. तसेच वर्षभरापूर्वी म्हणजेच फेब्रुवारी 2022 मध्ये तो 6.07 टक्के या पातळीवर किरकोळ महागाई दर नोंद झाला होता.
गेल्या तीन महिन्यात किरकोळ महागाई दरात किंचित प्रमाणात घट होताना दिसत आहे. डाळी, तांदूळ आणि भाजीपाल्याचे दर कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. तरीही एकंदर अन्नधान्य महागाई दर 5.95 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. जानेवारीमध्ये हा दर 5.94 टक्के इतका होता.
किरकोळ महागाई दर सलग दुसऱ्या महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 6 टक्के या उच्चतम पातळीच्या वर राहिला आहे. ग्राहक किंमत निर्देशांकाच्या बाबतीत अन्नपदार्थांचा वाटा जवळपास निम्मा आहे. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात गव्हासारख्या अन्नधान्याच्या किमती कमी झाल्या आहेत. सरकारनेही पुरवठा वाढवला आहे. याचा परिणाम किरकोळ महागाईच्या आकडेवारीवरही झाला आहे.