महाराष्ट्रातील कमल कुंभार ही महिला तिच्या कल्पकतेच्या बळावर आणि सामाजिक जाणिवेच्या ध्येयामुळे पाच हजार महिलांची तारणहार बनली आहे. त्या स्वतः मातीची भांडी तयार करणे आणि शेती अशी दोन कामे करतात. याच कामांचा विस्तार वाढवून त्यांनी आज पंचक्रोशीतील पाच हजार महिलांना सुनिश्चित रोजगार मिळवून दिला आहे. लहानपणी त्या आपल्या आईबरोबर बांगडय़ा विकण्याचे काम करीत होत्या. या कामांमधून प्रेरणा घेऊन त्यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती घेत अनेक कामे सुरू केली. त्यात आपल्या गावातील आणि आसपासच्या वस्त्यांमधील महिलांना रोजगार मिळवून दिला.
नंतर त्यांनी मायक्रो फायनान्स क्षेत्रातील प्रशिक्षण घेऊन इतर महिलांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे काम सुरू केले. मातीची मडकी बनविणे, शेती करणे, सरकारी योजनांमध्ये वृक्षगणना करणे, बांगडय़ा विकणे, पोल्ट्री व्यवसाय, भाजी विकणे अशा असंख्य कामांचा स्वतः अनुभव घेऊन त्यांनी इतर महिलांनाही प्रशिक्षित केले आहे. तसेच या कामांसाठी आवश्यक सरकारी संमतीपत्रे त्यांना मिळवून दिली आहेत. अशा प्रकारे केवळ घरात वेळ घालविणाऱया महिलांसाठी त्यांनी विविध रोजगारांची निर्मिती केलेली आहे. या कामाबद्दल त्यांना राष्ट्रपतींचा नारीशक्ती पुरस्कारही मिळालेला आहे. कोणतेही काम शिकता येते. केवळ निर्धाराची आवश्यकता असते, असे त्यांचे तत्वज्ञान आहे. महिलांनी रिकामा वेळ वाया न घालवता त्याचा उपयोग पैसा कमाईसाठी केला तर कुटुंबासह स्वतःचाही सन्मान त्या वाढवू शकतात, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे.