पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यापुस्तके : पहिल्या सत्राला सुरूवात
बेळगाव : दीड ते पावणेदोन महिन्याच्या उन्हाळी सुटीनंतर सोमवार दि. 29 पासून पुन्हा एकदा शाळा गजबजणार आहेत. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार सोमवारपासून पहिल्या सत्राला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून शाळांची स्वच्छता करण्यात आली होती. सोमवारी पहिल्याच दिवशी सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना पाठ्यापुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मागील शैक्षणिक वर्षाचा निकाल देण्यात आला. तेव्हापासून उन्हाळी सुटी देण्यात आली होती. यामुळे विद्यार्थ्यांचा किलबिलाट असणाऱ्या शाळांमध्ये शुकशुकाट होता. मागील 15 दिवसांपासून नवीन वर्षाच्या प्रवेशासाठी काही प्रमाणात गर्दी होत होती. खासगी व विनाअनुदानित शाळांची प्रवेश प्रक्रिया मागील दोन ते तीन महिन्यांपासून सुरू होती. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात प्रवेशाची अंतिम यादी जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला. शाळांची स्वच्छता करणे, शिक्षण विभागाकडून पाठ्यापुस्तके मागवणे, यासह इतर कामे शिक्षकांकडून सुरू होती. सोमवारी सरकारी शाळांमध्ये एसडीएमसी कमिटी याचबरोबर पालकांच्या बैठका घेतल्या जाणार आहेत. पुढील संपूर्ण शैक्षणिक वर्ष कसे असणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घ्यावा, यासंदर्भात त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षकांची कसरत
कोरोना काळात खासगी व विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थी सरकारी शाळांकडे वळले होते. परंतु त्यानंतर मात्र सरकारी शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस खालावत आहे. यावर्षीही सरकारी शाळांपेक्षा खासगी व विनाअनुदानित शाळांना प्रवेश सर्वाधिक झाले आहेत. त्यामुळे सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षकांची तारेवरची कसरत सुरू आहे. सरकारी शाळांमध्ये शिक्षक घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचे आवाहन करीत आहेत.