देखभालीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : शेडचीही दुरवस्था, उपाययोजना राबवण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध बसथांब्यांचा विकास करण्यात आला आहे. पण यापूर्वी निर्माण करण्यात आलेल्या बसथांब्यांच्या देखभालीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. खानापूर रोड, अनगोळ नाक्मयावर असलेल्या बसथांब्यावरील आसनव्यवस्था मोडकळीस आली आहे. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत थांबावे लागते. स्मार्ट सिटीतील बसथांब्यांच्या देखभालीसाठी मनपा प्रशासन लक्ष देईल का? अशी विचारणा होत आहे.
शहर आणि उपनगरात स्मार्ट बसथांबे उभारण्यासाठी कोटीचा निधी खर्च करण्यात येत आहे. पण असलेल्या बसथांब्यांच्या देखभालीकडे मनपा प्रशासनाने कानाडोळा केला आहे. लहान-मोठय़ा दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विविध बसथांब्यांच्या शेडची दुरवस्था झाली असून कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका आहे. तर काही ठिकाणी असलेल्या बसथांब्यांवरील आसन व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली आहे. विशेषतः धारवाड रोड, जिजामाता चौकातील बसथांब्यावरील खुर्च्या खराब होवून वर्ष उलटले. तसेच कॉलेज रोड शेजारील बसथांब्यावरील खुर्च्या मोडल्या आहेत. पण दुरुस्ती केली नाही. याच पद्धतीने अनगोळ नाका परिसरातील बसथांब्यावरील गर्डरची दुरवस्था झाली आहे. पण या ठिकाणी निर्माण होणाऱया समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
शहर व उपनगरातील प्रत्येक बसथांबा आठवडय़ातून एकदा स्वच्छ धुण्याची आवश्यकता आहे. पण याबाबत कोणतीच उपाययोजना राबविली जात नसल्याने सर्व बसथांब्यांवर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरल्यामुळे बसप्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बसथांब्यांच्या दुरुस्तीसह देखभालीसाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.