येळ्ळूरमधील शेतकऱ्याची बनली अवस्था गंभीर
बेळगाव : मोठे कुटुंब, चार भाऊ, शेतात काम करून उदरनिर्वाह सुरू असताना रिंगरोडसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची नोटीस आली. नोटीस येताच आता आपली जमीन जाणार, या धक्क्याने रक्तदाब वाढला आणि शेतकऱ्याला अर्धांगवायुचा झटका आला. जमीन म्हणजे शेतकऱ्याला माय. पण हीच जर हिसकावून घेतली तर जगायचे कसे? असा प्रश्न येळ्ळूर येथील बळीराम शंकर धामणेकर (वय 48, रा. कलमेश्वर गल्ली, येळ्ळूर) यांना हा अर्धांगवायुचा झटका आला आहे. मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात हरकत नोंदविण्यासाठी बळीराम हे आले होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना तुमची नोटीस आली आणि मला अर्धांगवायु झाला, असे सांगितले. 2021 मध्ये पहिली नोटीस आली. त्यावेळीच त्यांना हा झटका आला होता. बळीराम व त्यांच्या तीन भावांची 3 एकर 39 गुंठे येळ्ळूर शिवारामध्ये जमीन आहे. त्या जमिनीमध्ये भात, मिरची, बटाटा ही पिके ते घेत आले आहेत. शेती करत गवंडी, सेंट्रींग काम करून सर्वजण उदरनिर्वाह करत होते. मात्र अचानक ही नोटीस आल्यामुळे बळीराम यांना मोठा धक्का बसला. बळीराम यांना दोन मुली, एक मुलगा आहे. जर शेती गेली तर आपल्या कुटुंबांचे कसे? असा प्रश्न त्यांना पडला. अधिक ताण घेऊन हा आजार त्यांना जडला आहे, असे यावेळी त्यांनी प्र्राधिकरणाच्या कार्यालयात डोळ्यात पाणी आणून सांगितले. शेती घेतला तर आम्ही जगायचे कसे? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.