डॉ. सोमनाथ कोमरपंत यांचे प्रतिपादन
पणजी : साहित्याच्या क्षेत्रात फार प्राचीन काळापासून आदान प्रदान होत आहे. त्यामुळे माणूस समृद्ध होतो. आपल्या राष्ट्राची वाङमयीन संस्कृती, तिच्यातील विविधता,प्रतिभा विलास अनुभवायचा असेल तर भारतीय अस्सल कृतीचे अवगाहन आवश्यक असते.अनुवाद प्रक्रिया हा वृत्तीगांभिर्याने पार पाडायचा शब्दव्यापार आहे,असे प्रतिपादन सव्यसाची समीक्षक तथा साहित्यिक डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी येथे केले.इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा (आयएमबी) तर्फे सहा दिवसांच्या अनुवाद कार्यशाळेला आज प्रारंभ झाला त्यावेळी उदघाटन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कोमरपंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निमंत्रक तथा प्रसिद्ध समीक्षक डॉ.किरण बुडकुले व डॉ. आशा गेहलोत ,संस्थेचे अध्यक्ष दशरथ परब व सदस्य सचिव गोरख मांद्रेकर उपस्थित होते.
या कार्यशाळेत गोव्यातील प्रसिद्ध असे 26 अनुवादक व साहित्यात ऊची असलेले 25 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. कार्यशाळेत इंग्रजी समीक्षेच्या पुस्तकाचा कोकणी अनुवाद, डॉ. सोमनाथ कोमरपंत यांच्या क्षितिज समीक्षा ग्रंथाचा कोकणी अनुवाद व कोकणीतील 20 नामवंतांच्या कथांचा हिंदी अनुवाद असलेली अशी तीन पुस्तके प्रकाशित केली जातील. शिवाय बालसाहित्य विद्यार्थी अनुवादित करतील. आपले वेद, पुराणे, उपनिषदे, रामायण-महाभारत महाकाव्ये आणि अन्य अभिजात ग्रंथ हे मूळ संस्कृत भाषेतील आज निरनिराळ्या भाषांत अनुवादित झालेले आहेत त्यामुळे संचिताचा धांडोळा घेता आला याकडे निर्देश करून डॉ. कोमरपंत म्हणाले, विश्वसाहित्यातील आशय सामर्थ्याचा,अभिव्यक्ती सौंदर्याचा आणि भावसौंदर्याचा आकंठ आस्वाद घेता आला पाहिजे. प्रेमचंदांचे,सुब्रह्मण्यमभारती यांचे काव्य, मास्तींची चिक्कविर राजेंद्र यासारखी अक्षय साहित्यकृती, एस एल भैराप्पा यांच्या पर्व, मंद्र यासारख्या भव्य आशयाच्या चिरस्मरणीय साहित्यकृतींचे वाचन करतो तेव्हा आपल्या मनाचे, संवेदनशीलतेचे, जाणिवेचे क्षितिज विस्तारते.भारतीय मन आणि वारसा समजून घेण्याच्या प्रेरणेने अनुवादाचे कार्य करावे असे आवाहन त्यांनी जाता जाता केले. दशरथ परब यांनी स्वागत केले. गोरख मांद्रेकर यांनी प्रास्ताविक केले.