छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल परिसरातील घटना
प्रतिनिधी /बेळगाव
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाशेजारील सर्व्हिस रस्त्यांच्या समस्येबाबत सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. याबाबत वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. पण बेजबाबदार अधिकाऱयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी जुना धारवाड रोड येथील उड्डाणपुलाशेजारील सर्व्हिस रस्त्यावर अवजड ट्रक अडकून पडल्याची घटना घडली.
शहरातील रेल्वेफाटकावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलासह परिसरातील सर्व्हिस रस्त्यांच्या समस्येबाबत महापालिकेकडे आणि रेल्वे खात्याकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. तसेच येथील समस्यांचे निवारण करण्यासाठी निवेदनेदेखील देण्यात आली. पण महापालिका आणि रेल्वे खात्याने येथील समस्यांकडे दुर्लक्षच केले आहे. मागील आठवडय़ात देखील सर्व्हिस रस्त्यामुळे निर्माण झालेल्या समस्येचा आढावा घेणारे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.
याबाबत नागरिकांनी निवेदन दिल्यानंतर जुना धारवाड रोड उड्डाणपुलाशेजारील नाल्याची स्वच्छता करण्याचे नाटक करण्यात आले. पण हे कामदेखील व्यवस्थित करण्यात आले नाही. परिणामी अधिकाऱयांच्या दुर्लक्षाचा फटका नागरिकांना बसत आहे. याचा नमुना सोमवारी पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे. धारवाड रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाशेजारील सर्क्हिस रस्त्यावरून अवजड वाहन जात असताना रस्त्यात चाक रुतल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सदर रस्ते आणि नाल्याचे बांधकाम व्यवस्थित करण्यात आले नाही. त्यामुळे मालवाहतूक करणारा अवजड ट्रक रस्ता खचून अडकला आहे. ट्रक अडकल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तसेच याचा फटका येथील व्यावसायिकांसह वाहनधारकांना बसला. सर्व्हिस रस्ते दर्जेदार बनविण्यात आले नाहीत. अशातच दहाचाकी ट्रक या सर्व्हिस रस्त्यावर घालण्यात आल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. अडकलेला ट्रक बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. पण त्यात अपयश आल्याने ट्रकमधील साहित्य रिकामी करण्याची वेळ आली. प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे आतातरी प्रशासन सर्व्हिस रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष देईल का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. महापालिका आणि रेल्वे खात्याच्या अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन सर्व्हिस रस्त्यांच्या समस्यांचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.