सिरमूर / वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता त्या राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. शुक्रवारी काँगेस नेत्या प्रियांका गांधी यांची सभा झाल्यानंतर शनिवारी सिरमूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर सभेत काँगेसवर जोरदार हल्ला चढविला. समाजा-समाजांमध्ये भांडणे लावणे हेच काँगेसकडे आता एकमेव काम उरले आहे, अशी टीका त्यांनी केली.
हिमाचल प्रदेशात भाजपचा विजय निश्चित होईल अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘एक बार बीजेपी, बार बार बीजेपी’, असा नवा पायंडा हिमाचल प्रदेशातील जनता या निवडणुकीतून निर्माण करणार आहे. मागच्या वेळेपेक्षाही अधिक जागा यंदा भाजपला मिळतील आणि काँगेसचा धुव्वा उडेल असे प्रतिपादन त्यांनी केले.
हिमाचल प्रदेशातील हाती समाजाला नुकताच अनुसूचित जमातींचा दर्जा देण्यात आला आहे. यासाठी अमित शहा यांनी या समाजाचे आपल्या भाषणात अभिनंदन केले. हा दर्जा मिळावा यासाठी या समुदायाकडून गेली 55 वर्षे प्रयत्न सुरु होते. पंतप्रधान मोदी यांनी या समाजाचा साडेपाच दशकांपासून चाललेला संघर्ष संपुष्टात आणला आहे. अन्य कोणत्याही समाजाला न दुखावता पंतप्रधान मोदी शोषित लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र. समाजामध्ये नेहमी नवी भांडणे लावल्याखेरिज काँगेस स्वस्थ बसू शकत नाही. यामुळेच या पक्षाने जनतेचा विश्वास गमावला असून आज हा पक्षाची अवस्था दयनीय झाली आहे. हिमाचल प्रदेशातही काँग्रेसला धडा मिळणार आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.