अटल सेतूखालील कामे अपूर्णावस्थेत राहिल्याचा परिणाम
प्रतिनिधी / पणजी
राजधानीतील बसस्थानक परिसरात हिरा पेट्रोलपंप समोर अटल सेतूच्या जोडरस्त्याच्या भागात करण्यात येत असलेल्या स्मार्ट कामातील गोंधळी दिरंगाई यंदा पावसात पूराला निमंत्रण देणारी ठरणार आहे. याप्रश्नी साबांखा आणि मनपातील काही अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनीही पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यतेला दुजोरा दिला आहे.
अटल सेतू पूल बांधल्यापासून पेट्रोलपंपच्या भागातील जोडरस्त्याजवळ पूरस्थिती निर्माण होत होती. त्यातून पाण्याची पातळी धोकादायक स्थितीपर्यंत वाढल्यामुळे अनेकदा वाहतुक सुद्धा बंद ठेवण्याची वेळ आली होती. संपूर्ण रस्ताच पाण्याखाली जात असल्याने त्यातून वाहने नेणे म्हणजे वाहनासह स्वत:चा जीवही धोक्यात घालण्यासारखे ठरत असल्याने संपूर्ण वाहतूकच अडून पडत होती. सुमारे तीन पावसाळे या समस्येचा सामना केल्यानंतर गतवर्षीच पावसापूर्वी त्या रस्त्याला उंची देण्यात आली होती. त्यामुळे सदर समस्येवर तोडगा काढण्यात यश आले होते.
परंतु आता नवेच संकट उभे ठाकले असून याच पुलाच्या दुसऱ्या जोडरस्त्याच्या भागात चालू असलेल्या स्मार्ट कामांमुळे तेथे पूरस्थिती निर्माण होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. पुलाचा सदर जोडरस्ता वाहतुकीसाठी खुला केल्यापासून विविध कारणांमुळे अनेकदा बंद ठेवावा लागला होता. कधी खांब खचल्यामुळे तर कधी त्यावरील डांबर उखडल्यामुळे त्यावरून सुलभ अशी वाहतूक झालीच नव्हती. परिणामस्वरूप त्याच्या खालच्या भागात साचलेली माती, अन्य कचरा उचलणे शक्यच झाले नव्हते.
आता दोन महिन्यापूर्वीच या पुलाच्या भागात वाहतूक बेट उभारणे आणि अन्य सुविधा निर्माण करण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला होता. मात्र सदर मातीचे प्रमाण एवढे प्रचंड आहे की, आतापर्यंत शेकडो ट्रक भरतील एवढी माती काढण्यात आल्यानंतरही अद्याप तेथे मोठ्या प्रमाणात माती व अन्य कचरा शिल्लक आहे. भरीस तेथील जलनिचरा व्यवस्था पार लयास गेली आहे. पूर्वी कधीतरी टाकलेले विविध प्रकारचे केबल्स अस्ताव्यस्थ पसरलेले आहेत. ते तुटू नयेत याची खबरदारी घ्यावी लागत असल्याने कामास गतीच मिळत नाही. त्याशिवाय तेथे पाईप टाकणे, चेंबर्स बांधणे आदी कामेही हाती घेण्यात आली असल्याने ऐन पावसाच्या तोंडावर ती पूर्ण होणे शक्यतेच्या बाहेरील ठरले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसात हा संपूर्ण भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.