पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रतिपादन ; फलटणमध्ये स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित कार्यक्रम
प्रतिनिधी/ फलटण
राज्याचे मुख्यमंत्री सातारा जिह्यातील, मी जिह्याचा पालकमंत्री असल्याने जिह्यातील बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांच्या आमच्याकडून अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना बळ देणे, त्यांचे मागे खंबीरपणे उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. मी जोपर्यंत जिह्याचा पालकमंत्री असेल तोपर्यंत विकासाबाबत जिह्यातील सर्व तालुक्यांना समान न्याय देणार असून विकास निधी वाटपात कोणताही दुजाभाव करणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांची शिवसेना यांच्यावतीने फलटण येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बोलेत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, ज्येष्ठनेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, जयवंत शेलार, तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍड. नरसिंह निकम, विश्वासराव भोसले, महिला आघाडी जिल्हा प्रमुख शारदाताई जाधव, विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर, धनंजय साळुंखे-पाटील, बजरंग गावडे, सुशांत निंबाळकर, अमोल सस्ते, साखरवाडीचे सरपंच विक्रम भोसले, विराज खराडे, नानासाहेब इवरे, अशोकराव जाधव, विजय मायणे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री देसाई पुढे म्हणाले, तत्कालीन महाविकास आघाडीच्या काळात जिह्यातील फलटण आणि कराड तालुक्याला मोठय़ा प्रमाणात निधी जात होता, तरिही फलटणमध्ये अनुशेष राहतोय याचे आश्चर्य वाटत आहे. हे सरकार आपले आहे या जिह्यात भाजप-सेनेची पाती आहे. त्यामुळे जिह्याला निधी देताना भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनामधील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन दोघांनाही विकास निधी देतो. यामध्ये कुठलाही दुजाभाव केला जाणार नसल्याचे सांगत निकम यांनी उपस्थित केलेले सर्व प्रश्न मार्गी लावले जातील. फलटण येथील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे कार्यालय तरुण कार्यकर्त्यांनी काढले असून त्याला ताकद देणे आमचे काम आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी लोकांशी सतत संपर्कात राहावे, असा सल्ला यावेळी मंत्री देसाई उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी खासदार रणजितसिंह म्हणाले, झिरपवाडीतील शासकीय रुग्णालयाची इमारत इथल्या खासगी हॉस्पिटलला जोडण्याचे राजकारण प्रस्थापितांकडून चालू आहे, यात पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तालुक्यातील भाजप व बाळासाहेबांची शिवसेना एकत्र राहून खांद्याला खांदा लावून एकत्रित लढणार आहे. फलटण शहरातील अडीच वर्षातील विकास कामांचा अनुशेष भरून काढण्याची जबाबदारी आम्ही तुमच्याकडे पालकमंत्री म्हणून सोपवित आहोत. त्यामुळे आपण फलटणच्या विकासाचे पालकत्व घ्यावे अशी विनंती नव्हे तर नम्र विनंती करत असल्याचे यावेळी खासदारांनी स्पष्ट केले.
यावेळी ऍड नरसिंह निकम यांनी विविध प्रश्न उपस्थित करुन पालकमंत्रांचे लक्ष वेधले. प्रारंभी पालकमंत्री व खासदार यांनी बाळासाहेबांची शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. यानंतर पालकमंत्री देसाई यांचा नागरी सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत सचिन बिडवे, विजय मायने व पिंटु इवरे यांनी केले. प्रास्ताविक विराज खराडे यांनी केले. सूत्रसंचालन कोकरे यांनी केले. कार्यक्रमास भाजप, बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
विकास कामांचा अनुशेष भरुन काढणार
पालकमंत्री देसाई म्हणाले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी या भागातील विविध प्रश्न असून उपस्थित केले आहेत. त्यापैकी झिरपवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचा विषय आपण अनेक दिवसांपासून ऐकतोय, यावर तोडगा काढण्यासाठी संबंधित विभागाचे सर्व अधिकाऱयांच्या समवेत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू. आमच्या सरकारने जलसंपदा विभागाच्या 18 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यापूर्वीच्या सरकारला हे काम करता आले नाही, त्यामुळे नीरा देवधर विभागातील प्रलंबित सर्व प्रश्न सोडविले जातील. फलटण शहरातील विकास कामांचा अनुशेष भरून काढला जाईल.