अध्याय अठ्ठाविसावा
माणूस प्रपंचाला स्वत:पेक्षा वेगळा समजत नसल्याने त्यात तो समरसून जातो. प्रपंचातील घटना, व्यक्ती आणि परिस्थिती आणि हे सर्व पाहणारा, अनुभवणारा वेगवेगळे आहेत पण प्रपंच अद्वैत भासल्याने माणसाला तो आणि प्रपंच एकच आहेत असे वाटते. केळीचा गाभा सोलत गेलं तर हाती काय लागतं? काहीच नाही कारण तो पोकळच असतो. त्याप्रमाणे प्रपंच कितीही केला तरी हाती काहीच लागत नाही. परंतु त्यातही लोक स्वत:ची कल्पना लढवत बसतात. पाण्यात प्रतिबिंब दिसतं पण ते खरं असत नाही. त्याप्रमाणे प्रपंच खरा नसून माणसाला तो खरा वाटतो. त्या प्रतिबिंबात पाहून मनुष्य टिळा लावतो. त्याप्रमाणे तो देहाभिमानाचा टिळा स्वत:ला लाऊन घेतो. ज्याप्रमाणे अंधारातील निर्जीव दोराला मनुष्य साप समजून भीतीने थरथर कापू लागतो, त्याप्रमाणे देहाभिमानामुळे स्वत:चा देह आणि समोर दिसणारी दुनिया खरी समजून ती होताहोइतो आपल्याला अनुकूल कशी होईल ह्यासाठी त्याचा महाभयंकर खटाटोप चालू असतो. हा देहाभिमानच माणसाला अनेक जन्ममरण भोगायला लाऊन कल्पनेच्या पलीकडील दु:खे सोसायला लावतो. आत्म्यातूनच देहादेहात भेदभाव उपजला असे वेद सांगतो पण शरीरातील आत्मा त्रिगुणांनी वेढलेला असल्याने देहाच्या अहंकारामुळे भेदाभेद करतो हे कुणी बोलत नाहीत. म्हणून वेदवाक्याबद्द्ल लोक शंका घेतात. समोर दिसणारा प्रपंच खरा मानला की, मनात भेदाभेद आलाच म्हणून समज. त्यातूनच श्रेष्ठ, कनिष्ठ, गरीब, श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी असे भाव मनात येऊ लागतात. ह्या भावांची यादी बरीच लांबलचक होऊ शकते पण ती निरुपयोगी असल्याने आपल्याला त्यात फार लक्ष घालण्याचे कारण नाही. तूर्त एव्हढेच लक्षात ठेव की, वेदात सांगितल्याप्रमाणे निजात्मता किंवा आत्मस्वरूप, ही माणसाची खरी ओळख आणि समोर दिसणारी दुनिया, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्या समोर दिसणाऱ्या दुनियेतच त्याला अत्यंत प्रिय असलेल्या स्वत:च्या बायकामुलांसकट सर्वजण आले. एकदा उसाचे वाढे पेरले की, त्यातून पुढील उसाची निर्मिती आपोआप होत राहते. त्याप्रमाणे प्रपंच आपोआप वाढत राहतो पण मूळ वाढे आहे तसेच राहते किंवा सोन्याचे निरनिराळे दागिने केले आणि नंतर ते मोडले तरी त्यात असलेले सोने सोनेपणाने आहे तसेच राहते. त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या अवस्था प्रपंचात येतात आणि जातात पण मूळ वस्तू म्हणजे आत्मस्वरूप आहे तसेच राहते. समोर निरनिराळ्या वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती दिसत असल्या तरी त्या तात्पुरत्या आहेत असं समज आणि ती माझीच रूपे आहेत हे लक्षात घे. अरे माझ्याशिवाय येथे कोणत्याही गोष्टीला थारा नाही. एकूणएक निर्माण झालेली वस्तू आणि ती निर्माण करणारा, तिचे पालन करणारा आणि नंतर संहार करणारा मीच आहे. मी प्रपंच निर्माण केला पण मी त्यात नसतो. मृगजळ ही सूर्याचीच निर्मिती असते पण सूर्याला त्याच्याशी काहीच देणेघेणे नसते. उद्धवाने हे सगळे ऐकून घेतले आणि त्यावर विचार करून भगवंताना अशी शंका विचारली की, देवा, जग प्रत्यक्ष डोळ्यांना दिसतंय मग तो केवळ आभास आहे असं कसं म्हणता येईल? अर्थातच हा प्रश्न उद्धवाने आपल्या सगळ्यांच्या मनातले विचार ओळखूनच विचारला आहे हे लगेच लक्षात येतं. उत्तरादाखल भगवंत म्हणाले, अरे, काही काळ दिसणाऱ्या गोष्टी खऱ्या नसतात. त्या अव्यक्तातून येतात, काही काळ येथे नांदतात आणि पुन्हा अव्यक्तात निघून जातात. ह्या सर्व गोष्टी त्रिगुणात्मक असतात. त्यामुळे त्या मायिक असतात. ज्या गोष्टी मायिक असतात त्या कधी ना कधी नष्ट होणाऱ्या असतात आणि ज्या गोष्टी नाश पावणाऱ्या आहेत त्या कायम टिकणाऱ्या नसतात हे लक्षात घे. प्रपंच मिथ्या आहे हे लक्षात घेणे हेच खरे ज्ञान आहे. ह्याप्रमाणे जो सज्ञान झाला आहे तो सर्वांशी समत्वाने वागतो. त्यामुळे तो भुतांच्या गुणदोषांकडे ढुंकूनही पहात नाही.