कृषिमंत्री रवी नाईक यांचे उद्गार ; फर्मागुडीत राज्याभिषेक दिन साजरा
फोंडा : छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राज्यकर्ते होते. त्यांनी कधीच कुणावर अन्याय, अत्याचार होऊ दिला नाही. रायगडावर झालेला त्यांचा राज्याभिषेक ही ऐतिहासिक घटना आहे. शिवरायांचा आदर्श पाळताना कुणीही जाती-धर्माचे राजकारण करू नये, असे उद्गार फोंड्याचे पालकमंत्री तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनी काढले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे होत असल्याने हा ऐतिहासिक दिवस फर्मागुडी किल्ल्यावर साजरा करण्यात आला. फोंड्याचे पालकमंत्री रवी नाईक यांच्यासह वीजमंत्री सुदिन ढवळीकर व क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी शिवछत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शासकीय पातळीवर आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला बांदोड्याचे सरपंच सुखानंद गावडे, कवळे जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक यांच्यासह तालुक्यातील विविध पंचायतींचे सरपंच, पंचसदस्य व शिवप्रेमी उपस्थित होते.
महाराजांचे विचार रुजविण्याची गरज
मंत्री गोविंद गावडे म्हणाले, शिवरायांच्या कर्तृत्वातून संपूर्ण देशाने प्रेरणा घेतली. त्यांचे जीवनकार्य देशविदेशांतील लेखकांना लिहिण्यास प्रेरित करते. शिवराय हे केवळ राजे नव्हते तर धुरंधर राज्यकर्ते होते. राष्ट्रवादाचे प्रणेते असलेल्या शिवाजी महाराजांचे विचार व आदर्श मनामनात रुजविणे गरजेचे आहे. या हेतूनेच संपूर्ण गोव्यात शासकीय पातळीवर हा सोहळा साजरा होत आहे. मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य हे खऱ्या अर्थाने सुराज्य असल्याचे सांगितले. अल्पशा कालखंडात त्यांनी आदर्श राजाचा वस्तूपाठ घालून दिला. महाराष्ट्र व संपूर्ण देशाबरोबरच गोव्यासाठीही प्रेरणास्थान असलेल्या या युगपुरुषाचा राज्याभिषेक सोहळा सर्वांनी एकत्र येऊन साजरा करणे, हा त्यांच्याप्रती खरा आदर म्हणावा लागेल.