सूर्यफूल, सोयाबीन, भूईमूगची लागवड होणार अधिक : खाद्यतेलाच्या भरमसाट वाढीचा परिणाम
बेळगाव : खाद्यतेलाच्या किंमतीत भरमसाट वाढ झाल्याने यंदाच्या खरीप हंगामात तेलबिया क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषत: सूर्यफूल, सोयाबीन व भुईमूग पेरणीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षात तेलबिया उत्पादनाच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाली होती. मात्र खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतीमुळे पुन्हा तेलबिया उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात साहजिकच तेलबिया क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खरीप हंगामासाठी कृषी खात्याने 7.10 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये भात, ऊस, ज्वारी, मका, तंबाखू, कापूस यासह सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या तेलबियांच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. मागील काही वर्षात सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. दरम्यान या पिकांना योग्य हमीभाव देखील मिळाला नाही. परिणामी तेलबियांच्या पेरणीत घट झाली होती. मात्र आता खाद्यतेलाचे दर स्थिर झाले आहेत. त्यामुळे तेलबियांची पेरणी वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षी जिल्ह्यात 20.72 क्षेत्रात भुईमूग, 36.25 हेक्टर क्षेत्रात सूर्यफूल आणि 98.28 हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली होती. या तुलनेत यंदा हे क्षेत्र दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षापूर्वी तेलबियांना 2500 ते 3400 प्रति क्विंटल दर मिळत होता. आता त्यात काहीशी वाढ झाली आहे. रामदुर्ग, सौंदत्ती, बैलहोंगल तालुक्यात सूर्यफूल लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे. त्याबरोबर बेळगाव, हुक्केरी, गोकाक आदी तालुक्यात भुईमूगचे क्षेत्र वाढेल, तर इतर ठिकाणी सोयाबीनची पेरणीदेखील वाढणार आहे. जिल्ह्यात तेलबिया क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
तेलबियांणांच्या मागणीत वाढ
जिल्ह्यात तेलबियांणाच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे तेलबिया तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. परिणामी तेलबिया पेरणीचे क्षेत्र वाढणार आहे. या बियाणांची मागणी वाढणार असल्याने रयत संपर्क केंद्र व कृषी पतीन संघामध्ये बियाणे उपलब्ध करण्यात आली आहेत.
– राजशेखर विजापूर (सहसंचालक कृषीखाते)