बांगलादेशच्या अर्थमंत्र्यांचा विकसनशील देशांना इशारा
वृत्तसंस्था/ ढाका
बेल्ड अँड रोड पुढाकाराच्या माध्यमातून चीनकडून कर्ज घेणाऱया विकसनशील देशांना बांगलादेशचे अर्थमंत्री मुस्तफा कमाल यांनी इशारा दिला आहे. चिनी कर्ज घेण्यापासून दोनवेळा विचार करा. चीनकडून कर्ज घेतलेले देश आता संकटात सापडले आहेत असे कमाल यांनी म्हटले आहे.
चीनने स्वतःच्या कर्जांच्या मूल्यांकनासाठी एका अधिक ठोस प्रक्रियेचे पालन करणे गरजेचे आहे. चीन सध्या अवलंबित असलेली प्रक्रिया उदयोन्मुख बाजारपेठांवर दबाव टाकणारी आहे. कुठल्याही प्रकल्पाकरता कर्ज देण्यापूर्वी त्याचे सखोल अध्ययन करण्याची गरज असते असे बांगलादेशच्या अर्थमंत्र्यांनी नमूद केले आहे. जगभरातील स्थिती पाहता प्रत्येकाला कुठल्याही प्रकल्पाबद्दल सहमत होण्यासाठी पुन्हा पुन्हा विचार करावा लागेल अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.
प्रत्येक जण चीनला दोष देतोय
प्रत्येक देश चीनला दोष देत असल्याने तो याबद्दल असहमत होऊ शकत नाही. ही चीनची जबाबदारी आहे. चिनी अधिकारी या विशेष पैलूवर लक्ष देत नसल्याचे श्रीलंकेतील घडामोडीनंतर आम्हाला जाणवले आहे असे कमाल यांनी म्हटले आहे. बांगलादेशने मागील महिन्यात निधीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे संपर्क साधला होता. बांगलादेशातील विदेशी चलन साठय़ात सातत्याने घसरण होत आहे.
चीनकडून 4 अब्ज डॉलर्सचे कर्ज
बांगलादेश देखील चीनच्या बीआरआयमध्ये भागीदार आहे. सध्या बांगलादेशवर चीनचे 4 अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. बांगलादेशचा आपण सर्वात विश्वासार्ह दीर्घकालीन धोरणात्मक भागीदार असल्याचे चीनने म्हटले आहे. बांगलादेशवर एकूण 62 अब्ज डॉलर्सचे विदेशी कर्ज आहे.