जकार्ता येथील आसियान परिषदेला केले संबोधित
वृत्तसंस्था /जकार्ता
दक्षिण चीन सागरातील चीनच्या वाढत्या अरेरावीच्या पार्श्वभीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारत जागतिक मापदंडांनुसार आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात नौवहन, हवाई उ•ाण आणि मुक्त व्यापारी वाहतुकीसाठी प्रतिबद्ध असल्याचे उद्गार गुरुवारी काढले आहेत. जकार्तामध्ये 10 देशांची संघटना आसियान आणि त्याच्या काही भागीदारांच्या बैठकीला संबोधित करताना राजनाथ यांनी जगात स्थायी शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी चर्चा आणि कूटनीतिच्या महत्त्वाला अधोरेखित केले आहे. हा युद्धाचा काळ नाही आणि ‘आम्ही विरुद्ध ते’ ही मानसिकता सोडून देण्याची गरज आहे. संयुक्त राष्ट्रसंघ कन्व्हेंशन (युएनसीएलओएस) 1982 समवेत आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात नेव्हिगेशन, ओव्हरफ्लाइट आणि मुक्त व्यापारासाठी भारत प्रतिबद्ध असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. पूर्ण दक्षिण चीन सागरी क्षेत्रावर चीनकडून दावा करण्यात येत असल्याने या क्षेत्रातील तणाव वाढण्याची मोठी चिन्हे आहेत. चीनच्या या दाव्याला व्हिएतनाम, फिलिपाईन्स, ब्रुनेई समवेत अनेक देशांचा विरोध आहे. दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी गंभीर धोका असून त्याविरोधात ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे राजनाथ यांनी आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत म्हटले आहे. या बैठकीचे आयोजन इंडोनेशियाच्या अध्यक्षतेखाली पार पडले आहे.