गोडसेवाडी येथील घटनेने हळहळ : विद्युततार तुटून पडल्याने घडली दुर्घटना
बेळगाव : गोठ्यातील म्हशींवर विद्युततार पडून तीन म्हशींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गोडसेवाडी येथे मंगळवारी पहाटे 4 च्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या गरीब कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी पहाटे जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. याचवेळी सुनील महादेव कांबळे यांच्या जनावरांच्या गोठ्यातील विद्युततार तुटून पडली. गोठ्यातील जनावरांना स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. सदर गोठा हा लोखंडी पत्र्यांचा होता. त्यामुळे गोठ्यात असलेल्या तिन्ही म्हशींना विजेचा धक्का बसला. पहाटे जोरदार आवाज आल्यानंतर सुनील यांच्या घरातील मंडळी बाहेर पडली. यावेळी शॉर्टसर्किट झाल्याचे दिसून आले. या घटनेनंतर विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला. सदर वीजतार हुंदराने कुरतडल्याने ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र या घटनेत तीन जनावरांचा तडफडून मृत्यू झाल्याने साऱ्यांनाच धक्का बसला. यामधील दोन म्हशी गाभण होत्या. त्यामुळे शेतकऱ्याचे जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर सकाळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना व पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी जाऊन त्यांनी पंचनामा केला. या शेतकऱ्याला तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतर म्हशींचे शवविच्छेदन करून दफनविधी करण्यात आला. या प्रकारामुळे शेतकऱ्याला मोठा फटका बसला असून हे शेतकरी कुटुंब अडचणीत आले आहे. या म्हशींच्या दुधावरच त्यांचा उदरनिर्वाह होत होता. मात्र आता अचानक घडलेल्या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सुदैवाने अनेक जण बचावले
लोखंडी पत्र्यांचा हा गोठा होता. त्यामुळे संपूर्ण गोठ्यालाच वीजप्रवाह सुरू होता. त्यामुळे आत जाणे अनेकांनी टाळले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. जर कोणीही आत शिरण्याचा प्रयत्न केला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. अत्यंत सावधानता नागरिकांनी बाळगल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र जनावांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची नोंद टिळकवाडी पोलीस स्थानकात झाली आहे.