तुये येथील वन खात्याच्या कर्मचाऱयांनी घेतले अथक परिश्रम
प्रतिनिधी / पेडणे
हणखणे-चांदेल या तिळारी कालव्यात पडलेल्या 3 गव्यांना अथक परिश्रमाने कालव्यातून बाहेर काढण्यास तुये येथीन वनखात्याच्या कर्मचाऱयांना यश आले.
मंगळवारी 19 रोजी सकाळी 9.30 च्या दरम्यान हणखणे येथील तिळारी कालव्यामध्ये एकूण तीन गवे पडले होते. त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता याची माहिती स्थानिकांनी वन खात्याला दिली. त्यानंतर वन खात्याचे अधिकारी आणि खास पथक या ठिकाणी हजर झाले. शिवाय जमाव जमू नये यासाठी पोलिसही तैनात करण्यात आले होते. खास पथकाच्या तसेच स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने या तिन्ही गव्यांना दुपारी 2 वाजता बाहेर काढण्यात आले.
या कालव्यामध्ये तीन गवे सकाळी साडेनऊच्या दरम्यान पडल्याची माहिती मिळताच या ठिकाणी वनखात्याचे कर्मचारी व खास पथक हजर झाले. शिवाय पोलिसांचेही सहकार्य घेऊन या तिन्ही गव्यांना सुखरूप पणे बाहेर काढण्यासाठी यश आल्याचे तुये वनधिकारी गिरीश बैलूटकर यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी कालव्यात पडून दोन गव्यांचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी या कालव्यात दोन गवे पडले होते. त्यांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही गव्यांची कालव्यातच झुंज लागल्याने मोठी इजा झाली होती. त्यांना पाण्यातून बाहेर काढले तेव्हा त्यांचा मृत्यू झाला होता. त्या प्रकारचा वैद्यकीय अहवालही आला होता, अशी माहिती बैलूटकर यांनी दिली.
कालव्यात पडणाऱया रानटी जनावरांचा होतो मृत्यू
तिळारी कालव्यात अनेक रानटी जनावरे पडून मृत्यू पावली आहेत. उन्हाळय़ाच्या दिवसांत पाणी पिण्यासाठी ही रानटी जानावरे या कालव्यात उतरतात आणि त्यांना परत वर चढता येत नाही. पाण्यातच त्यांचा मग गुदमरून मृत्यू होतो. सरकारने या कालव्याला संरक्षक भिंत उभारण्याची मागणी होत आहे.