दोन्ही राज्यांच्या सुरक्षा दलांची संयुक्त कारवाई
रायपूर / वृत्तसंस्था
छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये शुक्रवारी चकमक झाली. या चकमकीत 3 नक्षलींचा खात्मा करण्यात आला. सायंकाळी उशिरापर्यंत चकमक सुरूच असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी संयुक्तपणे नक्षलींना घेरले होते. या चकमकीत महाराष्ट्राचे सी-60 कमांडो आणि छत्तीसगडच्या विजापूर जिह्यातील डीआरजी जवानांचा सहभाग आहे. चकमकीत अनेक नक्षलवादी जखमी झाल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. पोलिसांनी ठार झालेल्या नक्षलींचे मृतदेह आणि रायफल जप्त केल्या आहेत.
दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात नक्षलींच्या वरि÷ नेत्यांचा मोठा मेळावा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे छत्तीसगड आणि महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली. शुक्रवारी सकाळपासूनच जवान नक्षलींच्या कोअर भागात दाखल झाले होते. टेकामेट परिसरातील जंगलात ही चकमक झाली. जवानांनी डीव्हीसी कमांडरसह तीन नक्षलींचा खात्मा केला. यामध्ये 1 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. यापूर्वी विजापूर जिह्यात गेल्या महिन्यात झालेल्या भीषण चकमकीत 6 नक्षलवाद्यांना जवानांनी ठार केले होते. त्यात दोन महिला नक्षलवादीही होते.