महिला बालकल्याण खात्याचा आदेश
बेळगाव : लहान मुलांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या अध्यापनाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. अधिक वेळ मुलांमध्ये जावा, यासाठी सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत केवळ मुलांच्या शिक्षणासाठी वेळ द्यावा, अशा सूचना महिला व बालकल्याण खात्याने केल्या आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविका लहान विद्यार्थ्यांमध्ये अधिक वेळ दिसणार आहेत. जिल्ह्यात 5331 अंगणवाडी केंद्रे आहेत. या केंद्रातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांना विविध कामांचा ताण असतो. शिवाय मतदान कार्ड आणि इतर शासकीय कामेदेखील त्यांच्यावर सोपविली जातात. त्यामुळे लहान मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. यासाठी खात्याने आता अध्यापनाची वेळ निश्चित केली आहे. सकाळी 9.30 ते 4 यावेळेत अंगणवाडी शिक्षिकांना वेगवेगळी कामे करावी लागतात. गर्भवती महिलांना सकस आहार उपलब्ध करून देणे यासह घरोघरी माहिती संकलित करणे, महिला बालकल्याण खात्याकडून दिलेल्या सर्व कामांची पूर्तता करणे आदी कामांचा ताण असतो. त्यामुळे अंगणवाडी शिक्षिकांचा अधिकसा वेळ हा या कामातच जातो. त्यामुळे लहान मुले शिक्षिकाविना केवळ सेविकेवरच अवलंबून राहू लागले आहेत. यासाठी खात्याने निर्धारित वेळ निश्चित केली आहे. यावेळेत केवळ मुलांना शिकविण्याचे काम होणार आहे.
सकाळी 10 ते 1 यावेळेत मुलांना शिकविणे आणि त्यानंतर 1 ते 3 यावेळेत मुलांना केवळ विश्रांती देणे अशी सूचना खात्याने केली आहे. प्राथमिक आणि अंगणवाडीतील शिक्षिकांना शासकीय कामांसाठी जुंपले जाते. निवडणुका आणि इतर कामांचा ताण अधिक असतो. त्यामुळे कागदोपत्री घोडे नाचविण्यातच वेळ जातो. अशा कामामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होऊ लागला आहे. यासाठी निर्धारित वेळेत अंगणवाडी शिक्षिकांनी इतर कामे सोडून केवळ मुलांना शिकविण्याचे काम करावे, अशा सूचना देखील केल्या आहेत. अंगणवाडी स्मार्ट करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक अंगणवाडी सेविकेला स्मार्ट फोन देण्यात आला आहे. सर्व डाटा या मोबाईल फोनवरच अपलोड करणे बंधनकारक आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांचा वेळ या मोबाईलवरतीदेखील जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. याकरिता खात्याने आता अंगणवाडी सेविकांना सकाळी 10 ते 1 यावेळेत केवळ विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करावे, असे आदेश दिले आहेत.
शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी निर्णय
अंगणवाडी सेविकांनी मुलांकडे जास्त लक्ष द्यावे, यासाठी निर्धारित वेळ अध्यापनासाठी निश्चित करण्यात आला आहे. यावेळेत केवळ विद्यार्थ्यांना शिकविण्याचेच काम केले पाहिजे. अध्यापनानंतर 1 ते 3 यावेळेत बाकीची कामे करावीत, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
बसवराज ए. एम., सहसंचालक महिला व बालकल्याण खाते