डॉ. शेखर साळकर यांची माहिती : आज जागतिक तंबाखू विरोधी दिन
पणजी : तंबाखू सेवनाचे प्रमाण गोव्यात कमी झाले आहे. तरीही एकंदरीत कर्करोग रुग्णांची नवी प्रकरणे विचारात घेता 20 ते 25 टक्के नव्याने कर्करोग झालेल्यांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने कर्करोग झाल्याचे आढळून येत आहे. गोव्यात सिगारेट व विडी ओढणाऱ्यांचे प्रमाण आता फारच कमी झाले आहे. ही एक जमेची बाजू आहे. आज जागतिक पातळीवर ‘नो टॉबेको डे’ अर्थात विश्व तंबाखू विरोधी दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून नोट इंडिया म्हणजेच राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन संस्थेचे अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले की गोव्यातील पारिस्थिती जरी थोडीफार नियंत्रणात असली तरी ती एकदमच निवळलेली नाही. कारण गोव्यात दरवर्षी 300 ते 350 कर्करोगी असे सापडतात, ज्यांना झालेली ही बाधा तंबाखू व तंबाखुयुक्त पदार्थ सेवनाने झालेली आहे. दरवर्षी नव्याने 1500 कर्करोगी वाढतात. त्यातील तंबाखुशी निगडीत 20 ते 25 टक्के रुग्ण म्हणजेच साधारणत: 300 ते 350 रुग्ण हे तंबाखुशी निगडीत असतात. ही तशी गंभीर बाब आहे. राष्ट्रीय पातळीवर विशेषत: उत्तर भारतात साधारणत: 45 टक्के कर्करोगी हे तंबाखुशी निगडीत आहेत. तंबाखुच्या सेवनाचे परिणाम गंभीर आहेत. किमान 35 ते 45 टक्के नागरिकांना कर्करोगाशी लढावेच लागते. गोव्यात त्या तुलनेत तंबाखू सेवनाचे प्रमाण हे आता 9 ते 10 टक्के पर्यंत खाली आलेले आहे. गोव्यात जे काही यश प्राप्त झाले त्यासाठी स्व. डॉ. शरद वैद्य यांनी केलेले अथक प्रयत्न जबाबदार आहेत. त्याचबरोबर सरकारी अधिकारी व प्रसार माध्यमांनी दिलेली साथ यामुळेच हे शक्य झालेले आहे, असे डॉ. शेखर साळकर म्हणाले.