वृत्तसंस्था/ इंफाळ
येथे सुरु असलेल्या तिरंगी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी येथे यजमान भारत आणि किर्जी प्रजासत्ताक यांच्यात निर्णायक सामना होणार असून भारतीय संघाला या सामन्यात विजयाची नित्तांत गरज आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी भारतीय संघाला मंगळवारचा सामना बरोबरीत राखणे पुरेसा ठरेल.
या तिरंगी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत गेल्या बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने म्यानमारचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला होता. त्यानंतर गेल्या शनिवारी या स्पर्धेतील किर्जी प्रजासत्ताक आणि म्यानमार यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत राहिला होता. या स्पर्धेत जेतेपद मिळविण्यासाठी किर्जी प्रजासत्ताकला मंगळवारच्या सामन्यात भारतावर विजय मिळविणे गरजेचे राहिल. तर भारताला ही स्पर्धा जिंकण्यासाठी मंगळवारच्या सामन्यात किर्जी प्रजासत्ताकला बरोबरीत रोखावे लागले. पण मंगळवारच्या सामन्यात भारतीय संघ विजय मिळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल असे संघाचे प्रमुख प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी म्हटले आहे. फिफाच्या ताज्या मानांकन यादीत किर्जी प्रजासत्ताक 94 व्या तर भारत 106 व्या स्थानावर आहेत.