ऑनलाईन टीम/तरुण भारत
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (chhatrapati shivaji maharaj) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून पेटलेला वाद अजून शमलेला नसताना भाजप नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा (mangalprabhat lodha) यांच्या नव्या वादग्रस्त वक्तव्यानं राजकीय वादंग पेटलं आहे. दरम्यान, शिवतप्रताप दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह काही मंत्री प्रतापगडावर गेले आहेत. यावेळी भाषणादरम्यान, मंत्री लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानं नवा वाद पेटलाय. प्रतापगडावरील कार्यक्रमात बोलताना मंगलप्रभात लोढांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, प्रतापगडावरील कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करण्यात आलं होतं, त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदेंना कैद करण्यात आलं होतं. परंतु शिवाजी महाराज जसे आग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटले तसेच शिंदेही सुटले, असं म्हणत मंगलप्रभात लोढांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “ज्यांना महाराष्ट्र गद्दार म्हणून ओळखतो, ज्यांना महाराष्ट्र खोके सरकार म्हणून ओळखतो त्यांच्यासोबत महाराजांची तुलना करणं, हा काही चुकून आलेला शब्द नाही. हे पूर्णपणे नियोजित आहे. हे या सरकारचं आणि पक्षाचं नियोजन दिसतंय की, महाराष्ट्राचं खच्चीकरण करावं.”
हे ही वाचा : श्रद्धाची हत्या केल्याचा पश्चाताप नाही; आफताबकडून पॉलीग्राफी चाचणीत धक्कादायक खुलासे
याचबरोबर “राज्यपाल जे बोलतात तेच हे मंत्री आज बोलले आहेत. ही सगळी वस्तूस्थिती लोकांसमोर आलेली आहे. म्हणजे तुम्ही महाराजांची तुलना अशी करता का? हा महाराजांचा अपमान आहे, महाराष्ट्राचा अपमान आहे. हे मंत्री मुंबईचे वास्तव ओळखणारे नाहीत, तर मुंबईची realty ओळखणारे आहेत. त्यामुळे हा आवाज नक्की कोणाचा आहे हे ओळखून घ्या. पक्षाचा एक कलमी कार्यक्रम झालेला आहे”, असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं.