पावसाळी हंगाम संपून आता कोकणातील पर्यटन हंगाम सुरू होत आहे. कोकण किनारपट्टीवर पर्यटक येण्यास सुरुवातही झाली आहे. मात्र कोकण किनारपट्टीवर रत्नागिरीत दापोली, सिंधुदुर्गात तारकर्ली, शिरोडा-वेळागर या ठिकाणी मागील आठवडाभरात पर्यटक समुद्रात बुडाल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. यावरून वारंवार दुर्घटना घडूनही शासन व प्रशासन पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना गांभीर्याने करीत नसल्याचेच स्पष्ट होत आहे. पर्यटकांचा थोडा निष्काळजीपणा दुर्घटनेला कारणीभूत असला, तरी पर्यटनाच्या वाढीसाठी पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतल्यास कोकणातील पर्यटन अधिक बहरून येईल.
कोकण म्हणजे निसर्गाची उधळण. पूर्वेकडे सह्यादीच्या पर्वतरांगा, तर पश्चिमेकडे स्वच्छ समुद्र किनारे. हे समुद्र किनारे पर्यटकांना भुरळ घालतात. त्यामुळे अलिकडील पाच-सहा वर्षांत कोकण किनारपट्टीवरील समुद्र किनाऱयांवर पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. कोकणात नेहमीच पर्यटक येण्यास उत्सुक असतात. कोकणातील सिंधुदुर्ग तर देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित आहे. कोकणातील या दोन्ही जिल्हय़ांत पर्यटनाला चालना मिळण्यासाठी गेल्या वीस वर्षांत आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्यानंतर पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे कोकणात येणाऱया या पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यायलाच हवे.
कोकणातील सर्वच समुद्र किनारे स्वच्छ किनारे आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी कोकणातील समुद्र किनाऱयांना पर्यटक पसंती देत आहेत. परंतु समुद्रात बुडण्याच्या दुर्घटना वारंवार घडत असल्याने पर्यटकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. मागील आठवडाभरात रत्नागिरी जिल्हय़ात दापोली, सिंधुदुर्ग जिल्हय़ात मालवण तारकर्ली, शिरोडा-वेळागर या ठिकाणी पर्यटक समुद्रात बुडाल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. हे प्रकार वारंवार घडूनसुद्धा पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले गेलेले नाही. कोकणात पर्यटक येण्यास फार उत्सुक आहेत. परंतु त्यांना सुरक्षिततेची हमी सुद्धा हवी आहे. हे प्रकार न थांबल्यास भविष्यात कोकणातील पर्यटनाला बेक लागू शकतो.
कोकण किनारपट्टीवर जलपर्यटन, स्कुबा डायव्हिंग बहरू लागले आहे. सिंधुदुर्गातील तारकर्ली, देवबाग, रत्नागिरीतील गणपतीपुळे या ठिकाणी जलक्रीडा पर्यटनासाठी दरदिवशी हजारो पर्यटकांची गर्दी होत असते. परंतु, 24 मे 2022 रोजी तारकर्ली येथील समुद्रात बोट उलटून दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर कोकण किनारपट्टी हादरली होती. त्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यावेळी तारकर्ली एमटीडीसीसमोरील समुद्रात स्कुबा डायव्हिंगसाठी पर्यटकांची बोट गेली होती. बोटीत 20 पर्यटकांचा समावेश होता. स्कुबा डायव्हिंग करून परतत असताना ही बोट समुद्रात उलटली. या दुर्घटनेत बोटीतील सर्व पर्यटक समुद्रात फेकले गेले. यात लहान मुलांचाही समावेश होता. स्थानिकांच्या मदतीने बुडालेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यात आले. परंतु दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत पर्यटकांनी लाईफ जॅकेट घातली नव्हती. त्यामुळे बोट चालक आणि पर्यटक या दोघांचाही निष्काळजीपणा दुर्घटनेस कारणीभूत ठरला होता. यावरून पर्यटनाचा आनंद लुटताना पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिकांनीसुद्धा सुरक्षिततेला प्राधान्य द्यायलाच हवे, हे अधिक स्पष्ट झाले.
मे 2022 मध्ये घडलेल्या तारकर्ली दुर्घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱयांनी त्याची दखल घेत घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर आपत्कालीन यंत्रणांची बैठक घेऊन पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. मात्र प्रत्यक्षात पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस पाऊले उचलली गेली नाहीत. त्यामुळे समुद्रात पर्यटक बुडण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. जल पर्यटन करताना प्रत्येकाने लाईफ जॅकेट घालणे सक्तीचे आहे. परंतु बरेच पर्यटक तसे करीत नाहीत किंवा बोट चालकही त्यांना सक्ती करीत नाहीत. काही बोटींमध्ये तर लाईफ जॅकेटसुद्धा नसतात. त्यामुळे पर्यटकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. अशा परिस्थितीत बोटींची वारंवार तपासणी करणे, लाईफ जॅकेटचा वापर होतो की नाही, यावर नियंत्रण ठेवणे प्रशासनाचेच काम आहे.
कोकणातील पर्यटन हे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी स्वबळावर वाढविले आहे. पर्यटन व्यवसाय हा आता कोकणातील नंबर एकचा व्यवसाय बनला आहे. परंतु एखादी दुर्घटना घडते, तेव्हा पर्यटन व्यवसायावर व पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. पर्यटकांना सेवा देत असताना त्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देणे क्रमप्राप्त असते. कोणतीही दुर्घटना नकळत घडते. परंतु पर्यटनावेळी वातावरण अनुकुल आहे किंवा नाही हे पाहणेसुद्धा जबाबदारीचे असते. कारण दुर्घटना घडल्यावर काहींना आपला अनमोल जीव गमवावा लागतो. काहींना आपल्या कुटुंबाचा आधार गमावण्याची वेळ येते. एका क्षणात होत्याचे नव्हते होऊन जाते.
पर्यटक बुडण्याच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. या घटना घडल्यानंतर स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना जबाबदार धरले जाते. स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी न घेणे, हा त्यांचा निष्काळजीपणा आहेच. त्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. स्थानिक पर्यटन व्यावसायिकांवर चांगल्या प्रकारे नियंत्रण जिल्हा प्रशासनाने ठेवणे गरजेचे आहे. नौकांना परवानगी असते का? पर्यटकांची सुरक्षितता नीट राखली जाते का? याबाबत प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यायला हवी. समुद्र किनाऱयावर आनंद लुटणाऱया पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी जीवरक्षक नेमणे आवश्यक आहे. समुद्रात पर्यटक बुडण्याच्या दुर्घटना घडून सुद्धा जीवरक्षक नेमलेले नाहीत. वॉटर टॉवरसारख्या सुविधाही किनाऱयावर सज्ज ठेवायला हव्यात.
गोव्याच्या किनाऱयावर पर्यटकांची गर्दी होऊ लागल्याने कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हय़ाच्या किनाऱयावर मोठय़ा संख्येने पर्यटक येऊ लागले आहेत. त्यामुळे साहसी व जलक्रीडा पर्यटन वाढले आहे. त्यामुळे येणाऱया पर्यटकांसाठी सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी नगरपालिका व ग्रामपंचायतींनीही त्या-त्या किनाऱयावर जीवरक्षक नेमले पाहिजेत. त्याचबरोबर सूचना फलक, धोक्याचा इशारा देणारे सायरन लावणे आवश्यक आहे. नद्या, तलावांमध्येही पर्यटक बुडाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्याबाबतही स्थानिक प्रशासनाने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अति उत्साही पर्यटक जीव धोक्यात घालून पर्यटनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी पोलीस यंत्रणेकडून कडक पावले उचलली गेली पाहिजेत. गोवा किनारपट्टीवर ज्या पद्धत्तीने पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते, त्याप्रमाणे येथील जिल्हा प्रशासन व पालकमंत्र्यांनी लक्ष घालून जिल्हा वार्षिक योजनेमधून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करायला हव्यात.
कोकणची अर्थव्यवस्था पर्यटनावर उभी राहण्यासाठी येणाऱया प्रत्येक पर्यटकाच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी उपाययोजना केल्यास दुर्घटना टळतील आणि कोकणचं पर्यटन अधिक बहरेल एवढे निश्चित!
संदीप गावडे