अवजड वाहने, बेशिस्त पार्किंग जबाबदार
बेळगाव : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. बुधवारी शनिमंदिर व कपिलेश्वर उ•ाणपूल परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पाटील गल्ली, स्टेशन रोड व एसपीएम रोडवर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीने वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास शनिमंदिर कॉर्नरवर वाहतूक कोंडी झाली. काही बेशिस्त वाहनचालकांमुळे तासन्तास वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. बुधवारपासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला असून दुपारनंतर शाळा सोडण्यात आल्या. यामुळे शनिमंदिर कॉर्नरवर वाहनांची गर्दी झाली. कपिलेश्वर उ•ाणपुलावरून येणारी अवजड वाहने स्टेशन रोडवर जागेअभावी वळत नसल्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडली. रहदारी पोलीस असतानाही वाहनांची संख्या अधिक असल्यामुळे कोंडी सोडविण्यास उशीर लागला. भर दुपारी रणरणत्या उन्हाचे चटके आणि वाहनांच्या धुरामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली. परिणामी घामाच्या धारा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमची उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.