खानापूर : येथील शिवछत्रपती शिवाजी चौकात कायम होणारी वाहतूक केंडी सर्वांना त्रासाची ठरत आहे. नगरपंचायत व पोलिसांनी तातडीने याकडे लक्ष घालून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.
शिवाजी चौकात दोन्ही बाजूला बसथांबे आहेत. बेळगावहून येणाऱया बसेस व इतर वाहने प्रवाशांना उतरवण्यासाठी थांबवण्यात येतात. यावेळी शहरात जाणाऱया रस्त्यावरच एकापाठोपाठ एक अशा बस थांबल्याने वाहतुकीस अडचण होत आहे. हा बसथांबा जरा पुढे करून बस थांबवल्यास प्रवाशांना उतरणे व चढणे सोयीचे होणार आहे. मात्र बसचालक रस्त्यावर मध्येच बस थांबवत असल्याने प्रवासी उतरेपर्यंत दुसऱया बसेस येऊन थांबत आहेत. त्यामुळे बससह इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यामुळे रेल्वेस्टेशनकडे जाण्यासाठी व शहरात प्रवेश करणाऱयांना ताटकळत थांबावे लागत आहे. परिणामी येथे छोटेमोठे अपघातही घडत आहेत. बस थांबण्याच्या ठिकाणी वडाप व खासगी वाहने थांबविली जातात. त्यामुळे बसचालकाला बस थांबवणे देखील अडचणीचे होत आहे.हेस्कॉम कार्यालयापासून शिवछत्रपती चौकापर्यंत वाहतूक कोंडी होत आहे. हा गोवा-यल्लापूर प्रमुख रस्ता असल्याने इतर अवजड वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. या ठिकाणी कायम वाहतूक कोंडी होत आहे. यासाठी नगरपंचायतीने कायमस्वरुपी नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच पोलीस प्रशासनाने कायमस्वरुपी पोलीस नेमणूक करून वाहतुकीला शिस्त लावावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.